डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर: राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि संस्कारांचे पवित्र केंद्र | Author: Amol Pusadkar | Dr. Hedgewar Smruti Mandir Nagpur | Vidarbha Tourist Spots
नागपूरच्या रेशीमबाग परिसरात वसलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्मृती मंदिर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी स्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संघाची स्थापना केली. संघकार्याच्या विस्तारासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. रेशीमबाग परिसर ही त्यांची कर्मभूमी आणि तपोभूमी मानली जाते.
Dr. Hedgewar Smruti Mandir Nagpur
२१ जून १९४० रोजी याच पवित्र भूमीवर डॉ. हेडगेवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ येथे समाधीचे निर्माण करण्यात आले. कालांतराने या स्थळाचे भव्य स्मृती मंदिरात रूपांतर झाले. १९६२ मध्ये स्मृती मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पूजनीय श्रीगुरुजींनी या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "ज्या भूमीवर संघसंस्थापकांनी कार्य केले, घाम गाळला आणि अखेरचा श्वास घेतला, त्या भूमीकडे श्रद्धाभावाने पाहणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे."
Dr. Hedgewar Smruti Mandir Nagpur
स्मृती मंदिराची वैशिष्ट्ये | Why the Smruti Mandir is special?
स्मृती मंदिरात प्रतिष्ठापित असलेली डॉ. हेडगेवार यांची कांस्य धातूची मूर्ती मुंबईचे सुप्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब गोरेगावकर यांनी साकारली आहे. मंदिराच्या शिखरावर कमळपुष्पामध्ये ठेवलेल्या श्रीफळाची आकर्षक रचना भारतीय संस्कृतीतील पावित्र्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
मंदिराची कमान तीन धनुष्याकार रचनांनी सजलेली असून त्यामध्ये बाणाग्र आणि रोपणाग्राच्या कलात्मक आकृत्या आहेत. ही कल्पना पूजनीय श्रीगुरुजी यांनी सुचविली होती. त्यांनी कागदावर याचे चित्र काढून दिले होते. हे फारच थोड्या लोकांना माहित असेल. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीवर आठ पाकळ्यांच्या कमळपुष्पामध्ये ‘ॐ’ हे चिन्ह अंकित करण्यात आले आहे, जे भारतीय अध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवते.
स्मृतिचिन्ह आणि प्रेरणास्थळ | Inspiration of Hedgewar Smruti Mandir
५ जून १९७३ रोजी संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्रीगुरुजी (माधव सदाशिव गोलवलकर) यांचे निधन झाले. रेशीमबाग येथे डॉ. हेडगेवार यांच्या समाधीसमोर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी त्यांच्या जिवंतपणीच आपले स्मृती मंदिर किंवा पुतळा उभारू नये असे सांगितले होते. स्वयंसेवकांनी त्यांची ही आज्ञा शिरोधार्य मानली. परंतु पूजनीय श्रीगुरुजींचे संघाकरीता असलेले योगदान व स्वयंसेवकांच्या मनात त्यांचे असलेले स्थान व प्रेरक स्मृती बघता त्यांचेही एक स्मृती चिन्ह असावे असा विचार करण्यात आला. आज डॉक्टरांच्या समाधी व स्मृती मंदिरासमोर एक “यज्ञ कुंड” स्मृतिचिन्ह म्हणून उभारण्यात आलेले आहे. हे स्थान संघाच्या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जपणारे प्रेरणास्थान बनले आहे.
संघाचे तृतीय सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस यांनी त्यांचे कोणतेही स्मृती मंदिर, पुतळा व स्मृतिचिन्ह उभारू नये व अंत्यसंस्कार सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे दहन घाटावर केला जावा असे सांगितले. रेशीमबागचे “राजघाट” होवू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका इमारतीला मधुकर भवन असे नाव देण्यात आलेले आहे.
विविध स्मारके आणि भवन
या परिसरात संघाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ विविध भवनांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पांडुरंगपंत क्षीरसागर यांच्या स्मृतीतील पांडुरंग भवन, माधवराव मुळे यांच्या स्मृतीतील माधव भवन, यादवराव जोशी यांच्या स्मृतीतील यादव भवन तसेच बाळासाहेब देवरस यांच्या स्मृतीतील मधुकर भवन यांचा समावेश होतो. ही सर्व स्मारके संघकार्याच्या परंपरेची साक्ष देतात.
महर्षी व्यास सभागृह
रेशीमबाग परिसरातील आणखी एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे महर्षी व्यास सभागृह. सुमारे १५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या सभागृहात एकावेळी सुमारे २,००० व्यक्ती बसू शकतात. तळमजल्यावर भोजनकक्षाचीही व्यवस्था आहे. विविध शिबिरे, अभ्यासवर्ग, प्रशिक्षणवर्ग, आध्यात्मिक कार्यक्रम, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन येथे नियमितपणे केले जाते.
डॉ. हेडगेवार स्मारक समिती
Dr. Hedgewar Smarak Mandir Video: DIO-Nagpur District
स्मृती मंदिर आणि संपूर्ण परिसराचे व्यवस्थापन करण्यासाठी १९६१ मध्ये पूजनीय श्रीगुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून स्मृती मंदिराचे जतन, संवर्धन आणि परिसरातील विविध उपक्रमांचे नियोजन केले जाते.
डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर हे केवळ एक स्मारक नाही, तर राष्ट्रसेवा, त्याग, समर्पण आणि संघटनशक्ती यांचे जिवंत प्रतीक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. संघकार्याचा इतिहास, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि समाजसेवेची भावना यांचा संगम या पवित्र स्थळी अनुभवायला मिळतो. त्यामुळे रेशीमबाग येथील हे स्मृती मंदिर देशभरातील स्वयंसेवक आणि राष्ट्रप्रेमींसाठी प्रेरणेचे अखंड स्रोत बनले आहे. सर्व सामान्य नागरिक सुद्धा आपले ओळख पत्र दाखवून स्मृती मंदिराला भेट देवू शकतात.



good writing
ReplyDelete