गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra
हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Harishchandragad Trek
सर्वप्रथम मी रिल संस्कृतीला धन्यवाद करेल की त्याच्या मोहात मी निसर्गाच्या कुशीत जाण्याचा आणि त्यातही ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगडावर जाण्याचा निर्णय घेतला. काही गोष्टी सोशल ट्रेंड म्हणून केल्या तरी त्याने आत्मिक साद इतकी छान जुंपते की आपलं जीवनच डिस्कव्हरी वाटायला लागतं. कारण जे निसर्गात अनुभवास येतं ते चार भिंतींच्या महालात कधीच नाही येणार. रोजच्या दिनचर्येत अडकलेलो आपण या वेंधळ्या जगात अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो पण सपशेल अपयशी ठरून निराशेच्या टोकावर पोहचल्यावर निसर्गाचं शांत टोक आठवतं. मलाही आठवलं त्यामुळे माझ्यासारख्याचं ज्या दोघी मैत्रिणींना माझ्या आधी आठवलं त्यांना समोर करून मी वाट धरली मला हरवून टाकणाऱ्या वाटेची. उत्साह, थोडी भीती, आणि एक अनामिक ओढ मनात घेऊन आम्ही निघालो.
Amazing scenery during the journey
रात्रभराचा प्रवास… आणि पहाटे ३ वाजता आम्ही इगतपुरी स्टेशनला उतरलो. वातावरण थोडं गार, थोडं धूसर होतं. गाईडने जिवंत घरी पोहचून देण्याची ग्वाही दिली पण मनात तेव्हाच कूठे खरा थरार चालु झाला. थोड्या वेळाने आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पाचमई गावात पोहचलो. थकलेल्या शरीराला ताजेतवाणे करण्यासाठी फ्रेश झालो, गरमागरम नाश्ता केला आणि सकाळी ९ वाजता आम्ही खरं म्हणजे आमच्या 'आत्मयात्रे'ला निघालो. सुरुवातीला वाट सरळ होती, पण जसजसे पायऱ्या चढायला लागलो, तसतसं एक वेगळंच जग उलगडत गेलं. समोर हिरवीगार वाट, सभोवताली दाट धुकं, मधूनच दिसणारे झरे आणि त्याच्या मोहात वाहून जाणारे आम्ही. चालताना शरीर थकत होतं, पण मन मात्र त्या सौंदर्याचे "किती सुंदर हे" इतकंच गाणे गात होतो. बऱ्याच चढानंतर केवळ भौतिकचं नाही तर मानसिक चढानंतर आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर. वर पोहचल्यावर एक क्षणभर श्वास रोखला गेला. समोरचं दृश्य इतकं अद्भुत होतं की ते शब्दांत सांगणं अशक्य.
सगळच अद्भूत
गडावरचं जुनं मंदिर, त्या परिसरातलं शुद्ध शांततेचं वातावरण… आणि एक झाड जे कायम माझ्या काल्पनिक दुनियेच्या चित्रांमध्ये घर करून राहणार.. इतकं ते सुंदर. तेथील मंदिरातील शिवलिंग पूर्ण पाण्याच्या परिसरात बसलेला आणि मंदिराच्या उरलेल्या एकाच खांबाविषयी वेगळ्या भाबड कथा. असो. आतापर्यंत आम्हाला भुकेच्या महामायेने ग्रासले होते... सोबत आणलेल्या प्रोटीन बारच्या मदतीने पोहचलो आम्ही नजरेला आणि बुद्धीला भारावून टाकणाऱ्या 'कोकणकडा' येथे. तो क्षण… ते दृश्य… आयुष्यात एकदातरी अनुभवायला हवं असच! त्याच ठिकाणी आम्ही गरम जेवणाचा आस्वाद घेतला… आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला… आणि पावसाने खऱ्या अर्थाने परीक्षा घ्यायला सुरवात केली. पावसाचा जोर वाढलेला… वाटा ओल्या… जागोजागी धबधबे वाहत होते… पाय घसरत होते… चढण जितकी थरारक, उतरण तितकीच धाडसाची! शेवटी संध्याकाळपर्यंत आम्ही सगळे खाली आलो. अंगात त्राण नव्हतं, पण मन समाधानाने भरलेलं. दुसऱ्या दिवशी ट्रेक काहीसा सोपा होता. हपाट्याचा कडा. तिथलं दृश्यही कमालीचं सुंदर. ढगांमध्ये लपलेलं आकाश, पायाखाली खोल दरी… आणि मनात केवळ एकच भावना हे सगळं अनुभवायला मिळालं, त्यासाठी स्वतः घेतलेल्या निर्णयाचा आदर वाटायला लागला. हा ट्रेक माझ्यासाठी केवळ शारीरिक साहस नव्हतं, तर स्वतःला नवीन रूपात पाहण्याचा एक सुंदर प्रसंग, स्वतःला अनुभवण्याचा.. स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा... स्वतः च्या भितीला भिंतीच्या बाहेर काढण्याचा...
Amazing scenery during the journey
ट्रेकर्सची पंढरी | Amazing Trekking Spot Harishchandragag
हरिश्चंद्रगड ट्रेक हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आव्हानात्मक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १४२४ मीटर (४६९१ फूट) उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकर्सची पंढरी मानला जातो.
आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर
येथे प्राचीन गुहा, भव्य कोकणकडा आणि निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येते. हा गड पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. हा किल्ला ६ व्या शतकातील कलचुरी राजवंशाच्या काळातील आहे. त्यानंतर मुघल आणि नंतर १७४७ मध्ये मराठ्यांनी तो जिंकून घेतला.
आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर
प्रमुख आकर्षणे | Key places to visit during Harishchandragad Trek
कोकणकडा: हा महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि अर्धांगिनीच्या आकाराचा सरळ तुटलेला कडा आहे, जिथून ढगांचे आणि दऱ्यांचे नयनरम्य दृश्य दिसते.
केदारेश्वर गुहा: मंदिराच्या डाव्या बाजूला एक अतिशय प्राचीन आणि भव्य गुहा आहे, ज्यामध्ये मध्यभागी एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या चारही बाजूंनी पाणी आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर: काळ्या पाषाणात कोरलेले हे प्राचीन मंदिर शिल्पशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
तारामती शिखर: हे गडावरील सर्वात उंच शिखर (सुमारे ४८५० फूट) आहे. येथून आजूबाजूच्या पर्वत रांगा आणि माळशेज घाटाचे विहंगम दृश्य दिसते.
सप्ततीर्थ पुष्कर्णी: मंदिराच्या समोर असलेले पाण्याचे सुंदर कुंड.
ट्रेकिंगचे मुख्य मार्ग
पाचनई मार्ग : हा ट्रेक करण्यासाठी सर्वात सोपा आणि कमी वेळ लागणारा मार्ग आहे. पाचनई गावावरून माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ३ तास लागतात.
खिरेश्वर मार्ग : हा खिरेश्वर गावातून सुरू होतो. हा मार्ग थोडा आव्हानात्मक असून घनदाट जंगलातून आणि खडकाळ वाटेवरून जातो. माथ्यावर पोहोचण्यासाठी ५ तास लागतात.
बेलपाडा मार्ग : हा सर्वात कठीण आणि दमछाक करणारा मार्ग आहे (काळू नदीच्या पात्रातून).
ट्रेकसाठी सर्वोत्तम वेळ | When and how to plan a trek to Harishchandragad
पावसाळा : निसर्गात हिरवळ, धुक्याची चादर आणि अनेक छोटे-मोठे धबधबे पाहण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
हिवाळा : ट्रेकिंगसाठी सर्वात सुरक्षित आणि आल्हाददायक वातावरण असते.
खाद्य व निवास: गडावर स्थानिक गावकऱ्यांकडून (उदा. पाचनई किंवा खिरेश्वर येथील रहिवासी) राहण्याची आणि जेवणाची (झुणका-भाकर) सोय उपलब्ध असते. केदारेश्वर गुहेमध्येही पर्यटक रात्री मुक्काम करू शकतात.
कसे पोहोचाल
नागपूरहून हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी रस्ते, रेल्वे किंवा विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागपूर ते हरिश्चंद्रगड हे अंतर सुमारे ६६५ किमी आहे.
रेल्वे आणि बसने (सर्वात स्वस्त पर्याय): नागपूर ते इगतपुरी किंवा कल्याण रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वेगाडीने जाता येईल. तेथून पुढे आळेफाटा मार्गे माळशेज घाटातून जाणाऱ्या एसटी बसने 'खिरेश्वर' (हरिश्चंद्रगडाचे पायथ्याचे गाव) येथे पोहोचाल.विमानाने जायचे असल्यास नागपूरवरून मुंबईला जायचे. तिथून खासगी टॅक्सी किंवा एसटी बसने खिरेश्वर गावाला जायचे.खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडायचा असल्यास
नागपूर ते औरंगाबाद मार्गे (समृद्धी महामार्ग) माळशेज घाट - खिरेश्वर असे जाता येईल.




Comments
Post a Comment
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️