भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात पर्यटन ही केवळ विरंगुळा किंवा मनोरंजनाची गोष्ट राहिलेली नाही, तर ती ज्ञानवर्धन आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्याचे एक प्रभावी साधन बनली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक पर्यटन ही एक नवी संकल्पना उदयास येत आहे. या प्रकारच्या पर्यटनामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील सामाजिक प्रकल्प, उपक्रम आणि लोकजीवन यांचा अभ्यास करतात. सामाजिक पर्यटनाचा मुख्य उद्देश केवळ स्थळदर्शन नसून, त्या ठिकाणच्या समाजाच्या समस्या, त्यांच्या उपाययोजना आणि बदल घडवून आणणाऱ्या प्रयत्नांची माहिती घेणे हा आहे.
अशा पर्यटनातून व्यक्तीची सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होते. समाजात कोणत्या समस्या आहेत, त्यावर कशा प्रकारे उपाय केले जात आहेत, आणि आपणही त्यात कसा सहभाग घेऊ शकतो याची प्रेरणा मिळते. जबाबदार नागरिक बनण्याची जाणीवही वाढते. सामाजिक पर्यटनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्थानिक लोकांशी संवाद. त्यांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा आणि संघर्षांचा अनुभव घेताना सहानुभूती आणि समज वाढते. त्यामुळे समाजातील विविध घटकांमधील अंतर कमी होण्यास मदत होते. वास्तव जीवनातील हे अनुभव व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. एकूणच, सामाजिक पर्यटन ही केवळ एक प्रवासाची संकल्पना नसून, ती समाजाशी नाळ जोडणारी एक सशक्त चळवळ आहे. या माध्यमातून आपण केवळ निसर्ग आणि स्थळेच नव्हे, तर माणसांमधील नाते, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या संघर्षांची कहाणी समजून घेऊ शकतो.
तुम्हालाही सामाजिक पर्यटनाची आवड असेल तर विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या दुर्गम आदिवासी भागात लोकबिरादरीचे संचालक अनिकेत आमटे यांनी लोकसहभागातून तयार केलेले ‘तलावांचे जाळे’ नक्की बघून या ! यानिमित्ताने तुम्हाला आदिवासींशी हितगूजही साधता येईल. हा तुमच्यासाठी आगळावेगळा अनुभव असेल.
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Lok Biradari Prakalp
आदिवासी भागात पाणी ही केवळ गरज नसून जीवन-मरणाचा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या सहकार्याने अनिकेत आमटे यांनी उभे केलेले “तलावांचे जाळे” हे केवळ जलसंधारणाचे काम नसून एक सामाजिक क्रांतीच आहे. भामरागड परिसरात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण पाण्याची योग्य साठवण आणि व्यवस्थापन नसल्यामुळे उन्हाळ्यात भीषण टंचाई निर्माण होत असे. या समस्येवर उपाय म्हणून अनिकेत आमटे यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेत लहान-लहान तलाव, बंधारे आणि जलसाठे निर्माण करण्याची संकल्पना मांडली. ही कल्पना फक्त तांत्रिक नव्हती, तर लोकसहभागावर आधारित होती. गावकऱ्यांनी श्रमदान करून तलाव उभारले. या प्रक्रियेत त्यांनी केवळ पाणी साठवण्याचे काम केले नाही, तर आपली एकजूट आणि सामूहिक शक्तीही ओळखली. ‘आपलं पाणी, आपली जबाबदारी’ ही भावना त्यांच्या मनात रुजली. परिणामी, तयार झालेल्या तलावांची देखभालही गावकरी स्वत:च करू लागले. आतापर्यंत ३० तलाव बांधण्यात आले असून भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.
भामरागडमधील तलावांचे जाळे हे केवळ जलसंधारणाचे उदाहरण नसून, सामूहिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकास यांचे प्रेरणादायी प्रतीक आहे. ही क्रांती कशी शक्य झाली हे स्वत: अनिकेत आमटे यांच्याकडूनच समजून घेऊ यात...
‘तलाव क्रांती’ कशी घडली.... | How did Lake Revolution take place at Lok Biradari Prakalp - Aniket Prakash Amte
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा ने आत्ता पर्यंत 30 तलाव खोदले आहेत
"गडचिरोली जिल्ह्यात भामरागड भागात पावसावर अवलंबिलेली भाताची शेती केली जाते. पाऊस चांगला पडला तर भाताचे पीक चांगले होते. पावसाळ्यानंतर शेती ७-८ महिने पडून असते. आदिवासींसाठी शासनाने चांगली सिंचनाची सोय केली नाही. अनेक नद्या ओढे नाले या भागात वाहतात. त्यावर छोटे बंधारे नाहीत. सिंचनाची सोय नाही. अनेक गावात वीज नाही. म्हणून वर्षभरात एकच पीक होते. २०१६ च्या एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथील प्रगतिशील शेतकरी सीताराम मडावी यांची आणि माझी भेट झाली. गावातील हाल हवाल मी त्यांना विचारला. त्यांच्या गावात मालगुजारी तलाव आहे. अनेक वर्षांपूर्वी तो खोदण्यात/बांधण्यात आला होता. कालांतराने गाळ येऊन त्याची पाणी साठवायची क्षमता अगदी कमी झाली होती. साधारण 30 एकर भरेल इतका मोठा तो तलाव आहे. सीताराम मडावी अनेक वर्षांपासून शासनाच्या मागे लागले होते की गावच्या तलावाचे खोलीकरण करून द्या. पण त्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. भेटीत अशा काही व्यथा त्यांनी मांडल्या. दुसऱ्याच दिवशी मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या तलावाची पाहणी केली. आणि ठरविले कि या तलावाचे पुनरुज्जीवन आपण लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून करून द्यायचे. मे २०१६ मध्ये १५ दिवसात जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही त्या तलावातील गाळ काढून दिला. तलावाचे खोली करण करून दिले. त्या तलावाची क्षमता ५ पटीने वाढवून दिली. जी माती खोली करणात निघाली त्याचा वापर करून मजबूत पाल/मातीची भिंत आम्हाला बांधता आली. जुलै २०१६ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने तलाव अगदी काठोकाठ भरला. गावकऱ्यांच्या आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. या पाण्याचा उपयोग हिवाळी पिकांसाठी आणि मत्स्यपालन करण्यासाठी केला जात आहे."
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
"या वर्षी या गावातील लोकांनी ३ लाख रुपयांची मासोळी विकली. गावात पाणी आले की हाताला काम मिळू शकते. गावाला पैसे मिळू शकतात. यातून गावविकास होऊ शकतो हे जाणवले. पाणी साठा केल्याने विहिरींना पाणी येऊ शकते. प्राणी पक्षी झाडे आनंदात. एक तलावाचे खोलीकारण केल्यावर आणि त्याने फायदा झाला हे बघितल्यावर आमचा उत्साह वाढला. आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामसभांचे आमच्या गावातही तलाव करून द्या यासाठी विनंती अर्ज यायला लागले. आणि आता थांबायचे नाही असे ठरविले. पण तलाव निर्मिती किंवा जुन्या तलावाचे पुनरुज्जीवन ही कामे करतांना भरपूर पैसा लागणार होता आणि पुढे सुद्धा लागणार आहेत. ते कसे जमायचे ? फेसबुक / व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांचा उपयोग करून याकरिता पैसे उभे करता येतील असे वाटले. आणि अपील केले जनतेला. बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. एक तलाव नवीन करायचा तर साधारण १३ ते १५ लाख खर्च येतो. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी सुद्धा तलाव निर्मितीस खूप आर्थिक मदत केली. १०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३ मीटर खोल या मापात आपण तलाव खोदकाम केले आहे. खोदकाम केल्यावर प्रचंड प्रमाणात माती निघते. त्या मातीचा वापर करून उंच मातीची भिंत / पाल आपण बांधतो. त्यामुळे तलावाची क्षमता दुप्पटीने वाढते आणि ते पाणी लांबवर पसरलेले दिसते."
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
तलावनिर्मितीत गावकऱ्यांचा सहभाग | Village Participation in Lake Creation
"एका गावात आमची संस्था १३ ते १५ लाख रुपये तलाव निर्मिती साठी खर्च करते. शक्यतो तलावाची कामे ही डिसेंबर नंतर सुरू केली जातात आणि मे पर्यंत चालतात. या ४-५ महिन्यात साधारण आम्ही ४ तलाव खोदून / बांधून देऊ शकतो. दरवर्षी ४ तलावांची निर्मिती करू शकतो. खोदकाम हे जेसीबी/पोकलेन आणि टिपर / ट्रॅक्टरच्या साहाय्याने केले जाते. ओव्हर फ्लो बांधताना सिमेंट पाइप आणि काँक्रीटचा वापर केला जातो. बांधकाम हे शक्यतो गावातील लोकांच्या मार्फत होते. गावाची त्या तलावाशी बांधिलकी असायला हवी म्हणून गावातील लोकांनी १० टक्के खर्च तलाव खोदकाम साठी द्यावा ही आमची पहिली अट असते. आणि ही अट ग्रामसभेला मान्य असेल तरच आम्ही त्या गावात काम करतो. पण आज पर्यंत कोणीही नाही म्हटले नाही. एक प्रतिज्ञा पत्र गावाकडून आम्ही लिहून घेतो. गावात दारू विक्री होणार नाही. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व विक्री होणार नाही. गाव तंटामुक्त असेल. वन्यप्राण्यांची शिकार आणि जंगल तोड करणार नाही. वृक्ष लागवड व संवर्धन करू, इत्यादी. हे सर्व ग्रामसभा त्यांच्या लेटर पॅड वर आम्हाला लिहून देत असते. त्याचा काहीप्रमाणात नक्कीच परिणाम झालेला आम्हाला जाणवतो. गेल्या १० वर्षात आम्ही ३० गावात ३० तलावांची निर्मिती केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व अहेरी या २ तालुक्यातील जिंजगाव, बेजूर, दर्भा, दुडेपल्ली, घोटपाडी, हलवेर, हेमलकसा, हिंदूर, इरकडुमे, कोडपे, कोयनगुडा, कुमरगुडा, मडवेली, नारगुंडा, नेलगुंडा, पिडमिली, टेकला, तिरकामेट्टा , हेमलकसा टोला, लोक बिरादरी प्रकल्प, परायनार, मेडपल्ली, गुर्जा, वेडमपल्ली, मुकेला, सिपनपल्ली, कुडकेली, चंद्रा, सकिनगट्टा, तुमरकसा या गावांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाने तलावांची निर्मिती केली आहे. बऱ्याच गावांनी यावर्षी मत्स्यपालन करून १ ते २ लाख रुपये निव्वळ नफा कमविला आहे. पावसाळ्यानंतर डिझेल इंजिन पंप लावून तलावातील पाणी वापरून भाजीपाला लावतात. मका लावतात. काही वर्षांनी गावातील जनतेची आर्थिक परिस्थिती थोडीफार प्रमाणात नक्कीच बदलेल अशी आशा आहे."
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
तलाव निर्मितीतून झाले ‘आदर्श गाव’ | Ideal Village through Lake Creation
कोयनगुडा गाव लोक बिरादरी प्रकल्पाला लागूनच आहे. गावात “वतनकार” समाजाचे लोक राहतात. ते ओतीव कामातील उत्तम कारागीर आहेत आणि दैनंदिन वापरासाठी लागणारी विविध साधने, धान्य-भाजीपाला यांची साठवण करण्यासाठी भांडी, शोभेच्या वस्तू इ. बनवितात. जेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी एक तलाव खोदून देण्याची विनंती केली, लोक बिरादरी प्रकल्पाने ठरविले की गावात तलाव तर खोदायचाच, पण संपूर्ण गाव "आदर्श गाव" म्हणून विकसित करायचे. ग्रामसभेने नियमितपणे दारू पिणाऱ्या गावकऱ्यांवर दंड आकारण्याचे ठरविले.
तलावाचे खोदकाम सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेबरोबर एक करार करण्यात आला. त्यात खालील कलमे होती.
१. दारूबंदी
२. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
३. वृक्षतोडबंदी
४. शिक्षणाचा हक्क
५. शिकारबंदी आणि वन्य प्राण्यांचे संगोपन
६. तंटामुक्त गावकरार झाल्यावर काम मार्च २०१७ ला सुरु झाले.
अंदाजपत्रक साधारण १३ लाख रुपयांचे होते. १ लाख रुपये गावातून गोळा करण्यात आले. यामुळे, गावकऱ्यात एक मालकीची भावना निर्माण झाली. काम पूर्ण होण्यास साधारण एक महिना लागला. तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. मुसळधार पावसामुळे तलाव भरल्यास अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी "Waste Weir" नावाची यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात आली आहे. एक उघडी विहिर बांधण्यात आली आहे, जिचा व्यास १६ फूट आहे आणि जी ४० फूट खोल आहे. पाण्याची एक टाकीदेखील बांधण्यात आली आहे, जिची उंची २५ फूट आहे आणि साठवण क्षमता ५० हजार लिटरची आहे. ५ हॉर्स पॉवरचा (HP) एक सौरऊर्जेवर चालणारा पंप विहिरीतील पाणी खेचून टाकीत भरतो. कोयनगुडा गावात साधारण ७० घरे आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यात आला आहे. पाण्याच्या टाकीवर ८.५ लाख रुपये खर्च झाले. विहिरीवर ९ लाख रुपये खर्च झाले. एवढीच रक्कम पाईपलाईनवरदेखील खर्च झाली.
"कोयनगुडा गावाला आदर्श गाव बनविण्यातील पुढची पायरी म्हणजे शौचालय बांधणे. एक शौचालय नमुना म्हणून बांधण्यात आले. गावातील लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. घरपोच पाणी दिले तरच शौचालयाचा उपयोग होईल हा विचार मनात आला आणि टाकीची निर्मिती केली. लांब ओढ्यावरून, विहिरीतून किंवा गावातील सार्वजनिक हातपंप येथून पाणी आणून कोणीच संडास बाथरूम वापरणार नाही. टाकीचे बांधकाम सुरु झाल्यावर लगेच अनेकांनी संडास बाथरूम बांधायला घेतले. घरी पाणी आल्यावर लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. आज बरेच कुटुंब संडास बाथरूमचा वापर नियमित करीत आहेत. पुढील काही वर्षांत गाव खरोखर हागणदारी मुक्त होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पाणी घरपोच असेल तरच घरात शौचालय आणि बाथरूम बांधून त्याचा उपयोग जनता करेल. आम्ही प्रयोग म्हणून जिंजगाव आणि कोईनगुडा गावात उंच टाकी, विहीर, सोलर पंप, पाईप लाईन करून दिली आहे. प्रत्येक घरात पाण्याचा एक नळ दिला आहे. याचा फायदा नक्कीच होतोय. प्रशासनाने यावर विचार करावा."
भारतातील प्रत्येक घरात नळाने पाणी गेल्यावरच गाव हागणदारी मुक्त होऊ शकेल.
कार्यकर्त्यांची कठोर मेहनत | Volunteer Contribution at Lok Biradari Sankalp
लोक बिरादरी प्रकल्पात काम करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे या कामात आम्हाला १०० टक्के सहकार्य लाभते. प्रकल्पाचे काम हे टीम वर्क आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले कार्यकर्ते उन्हातान्हात तलावांची खोदकामे सुरु असतांना जातीने त्या कामावर लक्ष ठेवून असतात. यात कुठलाच वैयक्तिक स्वार्थ नाही आणि जनतेकडून अपेक्षा नाही. निरपेक्ष भावनेने ही मंडळी काम करीत असतात. सातत्याने काम केल्यावर जे फळ मिळते त्याचा आनंद कशातही मोजता येत नाही.
४५ वर्ष निरंतर सेवा
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावात लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून १९७३ पासून भामरागड भागातील माडीया गोंड आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा निरंतर पुरविली जात आहे. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची आणि अनेक कार्यकर्त्यांची कर्मभूमी असलेल्या या प्रकल्पाने या भागात शिक्षण, आरोग्य आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात गेली ४५ वर्ष निरंतर सेवा देऊन आमूलाग्र बदल घडविला आहे. आज या प्रकल्पात १ ते १२ पर्यंत शिक्षण देणारी आश्रमशाळा आहे. ६५० विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आहेत. अनेक आदिवासी बांधव या शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, फॉरेस्ट गार्ड, नर्स, तलाठी, पोलीस इत्यादि क्षेत्रात आपले भरीव योगदान देत आहेत.
२०१४ साली बाबा आमटे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त हॉस्पिटलची नवीन इमारत बांधण्यात आली. १०० रुग्ण राहू शकतील असे वॉर्ड आहेत. एक्सरे, पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, अति दक्षता विभाग, डिलीव्हरी रूम, डोळे तपासणी, दंत उपचार केंद्र, कमी वजनाचे बाळ जन्माला आले तर त्यासाठी वॉर्मरची सोय आणि आधुनिक ऑपरेशन थिएटर इत्यादि सोयी दवाखान्यात उपलब्ध आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील साधारणपणे ४५००० रुग्ण दरवर्षी या दवाखान्याचा लाभ घेतात. साधारणपणे ५०० वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन या दवाखान्यात दरवर्षी विनामूल्य केले जातात.
१२० अनाथ वन्यजीवांचे मायबाप
प्रकल्पात जवळपास १२० अनाथ वन्यजीवांसाठी अनाथालय चालविले जाते. मे २०१५ रोजी लोक आग्रहास्तव भामरागड तालुक्यातील अति दुर्गम अशा नेलगुंडा गावात आम्ही साधना विद्यालय ही इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा झाडाखाली सुरु केली. आज त्या शाळेत बालवाडी ते ५ वी पर्यंतचे वर्ग आहेत. ११ खेड्यातील सुमारे १३१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. लोक बिरादरी प्रकल्पापासून साधारण २७ किलोमीटर लांब हे गाव आहे. पावसाळ्यात या गावात पोहोचणे शक्य नसते म्हणून या शाळेला आम्ही पावसाळी सुट्टी देतो. १ जुलै ते १५ सप्टेंबर ही शाळा बंद असते. आणि पूर्ण उन्हाळ्यात ४५/४६ डिग्री तापमानात सुरु असते. शाळा कायमस्वरूपी विनाअनुदानित मान्यतेवर चालणार आहे. शाळेचा सर्व खर्च हा दानशूर व्यक्तींच्या देणग्यांवर केला जातो.



Great work
ReplyDeleteThis is great initiative. Such places should come to light
ReplyDeleteGreat work by Baba Amte family for tribals
ReplyDeletegood work
ReplyDeleteअनिकेत जी नागपूर मधे आपल या विषयावर व्याख्यान जरूर ठेवा. हे कार्य समोर येण आवश्यक आहे
ReplyDeletegood article
ReplyDeletethis is great work
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
ReplyDeleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
छान माहिती 💐
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
प्रेरणादायी 🌺🌺
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Positive work
ReplyDeleteउल्लेखनीय कार्य.
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
ReplyDeleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Baba Amte legacy
ReplyDeleteखूब खूब अभिनंदन....खूब छान कार्य...अशाच कार्याची गरज पूर्ण विदर्भासहित पूर्ण राज्याला आहे. अनेक ठिकाणी लोक प्रशासनाकडे चक्कर मारून थकले.... प्रशासनाच्या कानावर जु रेगत नाही. त्यामुळे सरकारच्या योजनाचा लाभ लोकांना मिळत नाही. सर्व ठिकाणी लोकसहभागजी गरज आहे. आम्ही विहिरींसाठी प्रयत्न करत आहे पण प्रश्नांचे लक्ष नाही .
ReplyDeleteखूब खूब अभिनंदन....खूब छान कार्य...अशाच कार्याची गरज पूर्ण विदर्भासहित पूर्ण राज्याला आहे. अनेक ठिकाणी लोक प्रशासनाकडे चक्कर मारून थकले.... प्रशासनाच्या कानावर जु रेगत नाही. त्यामुळे सरकारच्या योजनाचा लाभ लोकांना मिळत नाही. सर्व ठिकाणी लोकसहभागजी गरज आहे. आम्ही विहिरींसाठी प्रयत्न करत आहे पण प्रश्नांचे लक्ष नाही .
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿