विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism
कुठून आला आणि कुठे गेला हा समुद्र?
पृथ्वीची निर्मिती ४.५ बिलियन वर्षांपूर्वी झाली. पण पुढे सजीवांची निर्मिती मात्र फार कठीण आणि धिम्या गतीने होत गेली. प्रारंभी पृथ्वी अतिशय ज्वलंत होती. हळूहळू वरचा थर थंड होत गेला आणि समुद्र तयार झाला. याच काळातील म्हणजे ४०० ते २५० कोटी वर्षांदरम्यानचे खडक आजही पूर्व विदर्भात आढळून येतात. त्यांना आर्कियन खडक म्हणतात. स्ट्रोमेटोलाईट खडक तर (निओ प्रोटेरोजोइक) विदर्भात १६० कोटी वर्षांपासून अढळस्थान राखून आहेत. पृथ्वी निर्मितीच्या ३ अब्ज वर्षांनंतर समुद्रात सायनो बॅक्टेरिया तयार झाले आणि प्राण्यांची निर्मिती सुरू झाली. नंतर कीटक, मासे, सरपटणारे प्राणी, धावणारे जीव तयार झाले.
Dinosaur & Oceans in Maharashtra
गोंडवाना कालखंड हा विदर्भाच्या ऐतिहासिक, भौगोलिक व पुरातत्त्वीय दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. याच ३० कोटी वर्षांच्या काळात समुद्रात वाळू व माती मिसळली आणि समुद्र दूर जायला लागला. जंगलातील वृक्ष व जीव वरच्या थरात स्थिरावत गेले. जुरासिक या २० कोटी वर्षांच्या कालखंडात प्रचंड मोठे डायनासोर विकसित झाले. या शाकाहारी आणि मांसाहारी डायनासोरसोबतच विविध महाकाय प्राणीही तयार झाले. अशा मोठमोठ्या जीवांच्या निर्मितीमुळेच या काळाला ‘विशाल प्राण्यांचा काळ’ म्हणतात. क्रिटाशियस हा काळ जगात विनाशाचा काळ ठरला. पृथ्वीवर ज्वालामुखींचे उद्रेक झाले, लाव्हारस वाहू लागला. ६ कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्याकडून थेट नागपूर-चंद्रपूरपर्यंत लाव्हारस वाहात आला आणि सर्व जीव, जंगल जळून खाक झाले. पुढे लाखो वर्षांनी सजीव पुन्हा विकसित झाले. परंतु ते आकाराने लहान होते. या सर्व उलथापालथीत पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या अब्जावधी जीवांचे जीवाश्म तयार झाले. ते आजही भूगर्भात आढळतात. विदर्भात असे अनेक जीवश्म पुरावे मला आढळले आहेत. त्यात खालील जीवाश्मांचा समावेश आहे.
Stromatolites: Research by Prof. Suresh Chopane
स्ट्रोमेटोलाईट | Stromatolites in Vidarbha
पृथ्वीवर सर्वात आधी जन्म घेतलेला जीव म्हणजे सायनो बॅक्टेरिया! त्यांनी ३ अब्ज वर्षांमागे समुद्रात सूक्ष्म रुपाने जन्म घेतला. या जीवांचे खडकांच्या रुपातील तसेच जिवंत पुरावेही आज उपलब्ध आहेत. जमिनीवर पूर्वी जिथे समुद्र होता त्या भागात आजही स्ट्रोमेटोलाईट जीवाश्म आढळतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिप्राचीन काळी चक्क समुद्र होता. आणि हे शंभर टक्के सत्य आहे. कारण त्याच गतकालीन समुद्रातील चुनखडीच्या खडकात या जीवांचे जीवश्म आढळतात. वणी आणि चंद्रपूर तालुक्यात तर हे जीवाश्म अगदी स्पष्टपणे दिसतात. ते मी माझ्या संग्रहालयात सुरक्षित ठेवले आहेत. या काळात राजस्थान, मध्य भारत, उत्तर भारत, विदर्भ आणि पुढे इतर राज्यात काही ठिकाणी हा उथळ समुद्र होता. पुढे ५० कोटी वर्षेपर्यंत असलेल्या समुद्रात हळूहळू बदल होत गेला.
महाकाय डायनासोरचा उदय | Huge Dinosaur Evolution in Vidarbha
डायनासोरचा उदय अंदाजे २३ ते २४ कोटी वर्षांपूर्वी ट्रायसिक कालखंडात झाला. ते अर्कोसॉर्स नावाच्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. सुरुवातीला हे प्राणी छोटे आणि दोन पायांवर चालणारे होते. जे काळाच्या ओघात विविध आकारात परिवर्तित होऊन पृथ्वीवर वर्चस्व गाजवू लागले. त्यांचे युग होते... मेसोजोइक युग......
डायनासोरचा काळ हा तीन प्रमुख कालखंडात विभागला जातो.
१. ट्रायसिक कालखंड - उदय आणि सुरुवात
२.जुरासिक कालखंड - विशाल आकाराच्या डायनासोरचा सुवर्ण काळ
३. क्रीटेशिअस कालखंड - अंतिम विकास आणि ६.६ कोटी वर्षांपूर्वी नामशेष होणे.
पश्चिम महाराष्ट्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातील लाव्हारस नागपूर-चंद्रपूरपर्यंत वाहात आला. संपूर्ण जंगल आणि प्राणी नष्ट झाले. हा पृथ्वीवरचा अत्यंत भीषण विनाश होता. आजही विदर्भातील त्यात नष्ट झालेल्या जीवांच्या अवयवांचे तुकडे, अंडी, विष्टा आदी लाव्हा खडकाच्या आत तुरळक ठिकाणी आढळतात. माझ्या संग्रहालयातही ते बघायला मिळतात.
वृक्ष आणि पानांचे जीवाश्म
२० कोटी वर्षांच्या जुरासिक काळात जंगलांचा विकास झाला. अवाढव्य वृक्षांच्या सहवासातील महाकाय प्राणी तसेच अतिप्रचंड सजीवांचा तो काळ होता. नद्यांच्या प्रवाहात वाहून येणारे वृक्ष आणि पानांचे पुढे प्रतिलीपी जीवाश्म तयार झाले. असे जीवाश्म आज कोळसा खाणीत, नदीत आणि खोल भागात आढळतात. माझ्या संशोधनात मला असे जीवाश्म सापडले आहेत. विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात आणि सिरोंचा परिसरात मोठ्या झाडांचे जीवाश्म सापडतात.
Where was the sea?
मासे आणि शंख शिंपले जीवाश्म
पूर्व विदर्भात समुद्री पाण्यातील मासळ्यांचे जीवाश्म गोड्या पाण्यातील जीवाश्मांच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतात. सिरोंचा तालुक्यात मोठ्या माशांचेही जीवाश्म आढळले आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात गोड्या पाण्यातील शंख, शिंपले सापडले आहेत. वर्धा नदीत, माणिकगड पहाड रांगेत तसेच थेट यवतमाळ जिल्ह्यापर्यंत हे जलजीव आढळतात. वर्धा आणि उमरेड तालुक्यातही त्यांचे अस्तित्व आहे. ६ कोटी वर्षांपूर्वी विदर्भात वाहून आलेल्या लाव्हारसामुळे हे जलचर अश्मरुपात उरले. मी आतापर्यंत १५ ठिकाणी असे शंख-शिंपले शोधले असून त्यापैकी बरेच माझ्या संग्रहालयात सुरक्षित आहेत.
हत्तींचे जीवाश्म
२ लाख ते ११,००० वर्षांच्या प्लेइस्टोशिन काळात, भारतात सध्या अस्तित्वात असलेले काही हत्ती आणि प्राणी होते. परंतु काही वाघ, हत्ती तसेच अन्य प्राणी कायमचे नष्ट झाले. देशातील हिमालयीन क्षेत्रात हत्तींची जीवाश्मे आढळली आहेत. परंतु महाराष्ट्रात अशी हत्तींची जीवाश्मे सापडली नव्हती. मात्र मला २०२४ साली वरोरा तालुक्यातील वर्धा नदीजवळ हत्तीच्या हाडाचे आणि दातांचे काही जीवाश्म सापडले. ते २० हजार वर्षांपूर्वीचे असून हिमयुगानंतर वितळलेल्या बर्फाच्या महापुरात वाहून आलेल्या हत्तींचे असावेत. हा अश्मरुप हत्ती २० फूट उंचीचा होता, हे या जीवाश्मांचे वैशिष्ट्य होय. या भागात तयार झालेले हे जीवाश्म अगदी नाजूक असून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करताच ते तुटून जात. ते जीवाश्म मी माझ्या अश्म संग्रहालयात जपून ठेवले आहेत. विदर्भात आणि महाराष्ट्रात आढळलेले हे जीवाश्म म्हणजे एक मोठा वारसा आहे.
विदर्भातील विशिष्ट जीवाश्म स्थळे
विदर्भ हा दख्खनच्या पठाराचा भूगर्भीय भाग आहे. खरं तर सहा कोटी वर्षांपूर्वी बेसाल्ट हा ज्वालामुखी खडक हा महाराष्ट्रभर पहावयास मिळतो. परंतु त्यापूर्वी जेव्हा येथे समुद्र होता तेव्हा आजच्या बेसाल्टच्या खाली गोंडवाना सारखाच भूभाग आहे. जिथे वाळू, चुनखडक प्राचीन स्ट्रोमॅटोलाईट आणि डायनासोर सारख्या इतर प्राण्यांचे जीवाश्म सुद्धा आहेत. बेसाल्ट खडक हे खूप खोलवर असल्याने तिथे आज ते सापडत नाहीत. मात्र वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर येथे मात्र अनेक भागात गोंडवाना भाग सहज उपलब्ध असल्यामुळे तेथे जीवाश्म सहज सापडतात. याच भागात १५० कोटी वर्षांपूर्वीचे स्ट्रोमॅटोलाइटचे जीवाश्म आढळतात. त्यानंतरचे वृक्ष आणि पाने,डायनासोर, शंख शिंपले सापडतात. आज जिथे डायनासोरसोबत इतर अनेक जीवांचे पुरावे आढळतात त्यात सिरोंचा, चंद्रपूर,वर्धा आणि उमरेडचा समावेश आहे.
वर्धा व्हॅली महत्वाची ठरली
आज जी वर्धा व्हॅली आहे ती चंद्रपूर, वर्धा, सिरोंचा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत विशेष भौगोलिक स्थळ आहे. इतर ठिकाणी बेसाल्ट राहिला. विदर्भात मात्र पाच ते सहा किलोमीटर खोल दऱ्या खोऱ्या शिल्लक राहिल्या. १० कोटी वर्षे काळापासून पुढे इथे या दरीत जंगले वाहून आली आणि कोळसा तयार झाला, मिथेन वायू जमा झाला. समुद्राच्या लांब दऱ्यात वाळू, चुना, रेती आणि खडक गोळा होत राहिले. ६ कोटी वर्षांनंतर येथील दऱ्या भरल्या आणि आजही त्या तश्याच भरून दिसतात, केवळ जिथे कोळसा खाणी आहेत तिथेच जुना काळ दिसतो. खऱ्या अर्थाने ६ कोटी वर्षापूर्वीच येथील समुद्र दक्षिण समुद्राला मिळाला आणि विदर्भात भूभाग तयार झाला.
Last Day of the Dinosaurs
समुद्र परत येणार का?
कोट्यवधी वर्षांपूर्वी गायब झालेला समुद्र भविष्यात पुन्हा वापस येईल का याचा अंदाज घेतला तर निश्चित पुन्हा येईल परंतु त्यासाठी कोट्यवधी वर्षे लागणार आहेत. अर्थात तेव्हाचे समुद्री पुरावे आणि अस्तित्व आजही आढळते. वि्ज्ञान, भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक विषयांसाठी हा इतिहास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.
प्रा. सुरेश चोपणे
इतिहास अभ्यासक आणि संशोधक
चंद्रपूर

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

wow!!
ReplyDeletenice article...
ReplyDeleteInteresting ahe he
ReplyDeleteखूपच interesting
ReplyDeletevery nice
ReplyDeletegood research sir
ReplyDeleteGreat
ReplyDeleteDid dinosaur live in vidarbha sir?
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete