‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India
पर्यटन हे सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनातील धावपळ आणि तणावातून मुक्त होऊन विरंगुळा मिळवण्यासाठी पर्यटन उत्तम माध्यम आहे. म्हणूनच पर्यटनाला एका फिरत्या शाळेची उपमा दिली जाते. असं म्हणतात की, आनंद आणि समाधान मानण्यात असतं. बरेचदा तीर्थक्षेत्री, किल्ले, नद्या, डोंगर पर्वतरांगा आपण अनेकदा पाहिलेलं असतं. दर्शनाचा कधी आनंद घेतो, तर निसर्गरम्य वातावरणात मन प्रसन्न करून येतो. डोंगरावर चढताना मनात पेटून उठलेली ऊर्जा प्रत्येक आयुष्यात येणाऱ्या खासखळग्यांना असंच सामोरं जाण्याची जिद्द देऊन जाते. अनेक वेळा, त्याच त्याच ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला वेगळाच आनंद उपभोगायला मिळतो, अनुभव शिकवून जातात.
The Taj Hotel, Mumbai
भारतातील सर्वात व्यस्त शहर म्हणून परिचित मुंबई हे अनेकांचं निवासस्थान आहे, कुणाचं माहेर, कुणाचं सासर, कुणाचं अर्थार्जनाचं स्थान, तर कुणी शिक्षणासाठी या शहरात जाऊन पोहोचतं. माझ्या या लेखात मी मात्र एक पर्यटक म्हणून मला मुंबईचा आलेला अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईची संस्कृती परंपरा, धर्म, व्यंजन, संगीत आणि ललित कला यांचे मिश्रण आहे. सर्व जगाचे लक्ष असलेली आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई! लहानपणी अनुभवलेली मुंबई आणि मोठेपणी डोळसपणे न्याहाळलेली मुंबई यात अंतर आहे.
सात बेटांचा समूह | Seven Islands that formed Mumbai
ऐतिहासिक वारसा, देखणी सागरी किनारपट्टी, झगमगती जीवनशैली आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने एक जागतिक महानगर आहे. स्वातंत्र्य लढ्यात मुंबईचे महत्त्व मोठे होते. आज मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक महानगरी असली तरीही गेटवे ऑफ इंडिया यांसारखी ऐतिहासिक वास्तू, विविध सांस्कृतिक वारसा आणि संपन्न जीवनशैली यामुळे मुंबई एक अद्वितीय शहर ठरते. सात बेटांपासून विकसित झालेली ही नगरी आज देशाचे आर्थिक आणि मनोरंजन केंद्र आहे. थोडा विसावा देणारी, थांबून विचार करायला लावणारी, अनेक नाती जोडणारी.. तर कधी करकचून भांडायलाही लावणारी.. लोकल आणि तिचा अनुभव जेव्हा आपण घेतो त्या वेळेला तिला मुंबईची जीवन वाहिनी का म्हणतात, याचं वारंवार प्रत्यंतर येतं.
पर्यटक म्हणून आपण मुंबईला जातो त्यावेळी आपल्याला कारमध्ये निवांत बसून एसी ची हवा घेत मुंबई बघण्याचं आकर्षण वाटतं. जेव्हा आपण मुंबईच्या उंबरठ्यावर पाय ठेवायला लागतो त्यावेळीच गर्दीत चढताना होणारी तारांबळ, तिच्यातले धक्के, वाद आणि बरंच काही आपल्या रेल्वेतूनच आपल्याला बघायला मिळतं. हे नेत्र सुख विलक्षण असतं. दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणाऱ्या या लोकलला, मुंबईच्या गतीचे आणि ऊर्जेचे प्रतीक म्हटले जाते. एकेकाळी सात बेटांचा समूह असलेली मुंबई आज भारताच्या उद्योग, वित्त, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राची केंद्रबिंदू बनली आहे. सर्वांना हे शहर मोठा आहे पण यातला खरेपणा म्हणजे या शहराची माणुसकी जोपासण्याची परंपरा!
Mumbai Sealine
इथे गगनचुंबी इमारती आणि झोपडपट्ट्या दोन्ही शेजारी शेजारी गुण्यागोविंदाने नांदतात. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक मुंबईतील चाळीमधील लोकांचे वर्णन करणारे पुस्तक आजही प्रसिद्धच आहे. चाळी फक्त मुंबईतच आहेत असे नाही. दुसऱ्या शहरांमध्येही होत्या; पण मुंबईमध्ये जेवढ्या चाळी आहेत, तेवढ्या इतर शहरांमध्ये नाहीत. या चाळ संस्कृतीनं संस्कार, माणुसकी, आपलेपणा या शहरात रुजवला. जुन्याचा अस्त झाला, पण त्या पाऊलखुणा जपल्या. भूतकाळाची पाने पलटून स्मरणरंजनाचे सुख अनुभवले. जुन्याच्या जागी आलेल्या नव्याचे स्वागत केले, त्याला आपलेसे केले. हे शहर जुन्या ट्रामच्या आठवणी सांगते, तेव्हा मेट्रोविषयीही उत्सुकता दाखवते. विविध भाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा याचे अनोखे मिश्रण अन्य कोणत्याही शहरात सापडणार नाही. इथे कोळीवाड्यातली धूम आहे, माऊंटमेरीची जत्रा आहे, दहीहंडीचा थरार आहे, गणेशोत्सवातील मंगल वातावरण आहे.
कबीरजी म्हणतात,
चाह गई, चिंता मिटी
मनवा बेपरवाह
जाको कछु न चाहिए
वो शाहन का शाह॥
म्हणतात ना, समाधान हेच सर्वात मोठं धन. अमेरिकेच्या मियामी शहरातील आर्क डेको शैलीच्या इमारती पाहण्यासाठी खास पर्यटक त्या शहरात येतात. दक्षिण मुंबईतील चर्चगेट, मरिन ड्राइव्ह तसेच मरिन लाइन्स परिसरातील इमारतीही आर्क डेको शैलीच्या आहेत.
खाद्यशैलीचा अनोखा संगम | Food Culture in Mumbai
खाद्य संस्कृतीवर बोलल्याशिवाय मुंबई अपूर्णच आहे. विविध प्रांतांतील खाद्यशैली आणि संस्कृतींचा एक अनोखा संगम मुंबईत आहे. ‘वडापाव’ ही मुंबईची ओळख असून तो आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे. सोबतच भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, आणि तवा पुलाव यांचादेखील समावेश आहे. इडली-वडा-डोसा, ढोकळा, खांडवी आणि फाफडा हे पदार्थही मुंबईच्या खवय्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर समाविष्ट आहेत. इराणी चहा, मस्का-पाव, इटालियन आणि बरंच काही रात्री उशिरापर्यंत उत्कृष्ट खाद्यपदार्थांसाठी गजबजलेली ठिकाणं मुंबईला आहेत.
‘ये है मुंबई मेरी जान’, असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो. रोजची आर्थिक चढाओढ, चंदेरी दुनियेची सफर ,फास्टफूडची तसंच क्रिकेटच्या देवाची अशी ही मुंबापुरी आहे. दररोज प्रगतीची नवनवी शिखरं गाठताना मुंबईला साथ असते ती इथं राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराची.
ओपन बसमधून मुंबई अनुभवताना...
भारत जैवविविधतेसाठी जगविख्यात आहे. अगदी सह्याद्रीच्या सर्वश्रृत कड्यांपासून ते ‘सुंदरबन’च्या जंगलापर्यंत भारत हा जैवविविधतेची खाण आहे. सागर किनारे दिल ये पुकारे म्हणत समुद्राच्या कडेला लाटा पाहात बसणे कित्येकांसाठी परवणी असते. गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी याशिवाय, मुंबईत अजूनही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. ओपन बसमधून मुंबई अनुभवताना विलक्षण अनुभूती येते. आजुबाजूला असलेलं व्यापक विश्व, जा- ये करणाऱ्या अपरिचित माणसांची परिचीत दिनचर्या, हाॅर्नचे आवाज या सगळ्या गोंधळात लहानगी मुलं त्यांची निरागसता सगळं कसं काहीतरी सांगून जातं. खिडकीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य, डब्यातील प्रवाशांशी होणाऱ्या गप्पा आणि फलाटावरील खाद्यपदार्थांची रेलचेल मनाला ताजी करते. समांतर रेषा समजताना रेल्वे रुळांचं उदाहरण दिलं जातं. तसं पाहिलं तर न भिडणाऱ्या या रेषा आयुष्यातली अनेक वळणं सोप्पी करून जातात.
खिडकीबाहेरचं नयनाभिराम दृश्य आणि अंतर्मनातलं समाधान यांचा सुंदर संगम म्हणजे रेल्वे प्रवास! मुंबई पर्यटक म्हणून बघण्यात (वारंवार) एक वेगळी मजा आहे. घरी जाताना रेल्वेतून मनाला आश्वासन दिलं परत यायचंच आहे कारण....दिल अभी भरा नहीं!
Yeh Hain Bambai Meri Jaan | Johnny Walker
तुम्ही येथे गेले आहात का? कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !
हिमगौरी देशपांडे
लेखक
वरोरा (चंद्रपूर)



Comments
Post a Comment
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️