दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism
मराठवाड्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते दुष्काळ, पाणीटंचाई आणि रखरखीत भूमीचं चित्र. मात्र हीच ओळख मराठवाड्याचं संपूर्ण वास्तव सांगत नाही. पावसाळ्याच्या आगमनानंतर हा प्रदेश नव्या रूपात खुलतो. हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळत कोसळणारे धबधबे, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले जलाशय आणि जागतिक वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू यामुळे मराठवाडा पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतो. अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून म्हैसमाळच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांपर्यंत, नाथसागरच्या विस्तीर्ण जलाशयापासून सहस्त्रकुंडच्या रौद्र सौंदर्यापर्यंत अनेक ठिकाणं पावसाळ्यात नव्याने जिवंत होतात. मराठवाड्याच्या या दुर्लक्षित पण समृद्ध पर्यटन वारशाची ओळख करून घेणं आज काळाची गरज आहे.
मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छ. संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत बरीच लहान मोठी पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक नेत्यांनी इथे कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे जिथे सामान्य सुख सोयी मिळण्याचीच भ्रांत आहे तिथे निसर्ग पर्यटन वगैरे गोष्टी तर दूरच. सोबतच निसर्ग संवर्धन करण्यात मराठवाड्याची जनता देखील तेवढीच उदासीन. त्यामुळे इथं निसर्ग पर्यटन काही म्हणावं तसं फुललं नाही. मराठवाडा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. येथे अनेक पर्यटनस्थळे आहेत जी इतिहास, निसर्ग आणि धार्मिक महत्त्व असलेली आहेत. काही प्रमुख पर्यटनस्थळांची ओळख आपण करुन घेऊ यात.
अजिंठा आणि वेरूळ लेण्या | Ajanta Caves
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या लेण्या बौद्ध, हिंदू आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडवतात. मराठवाडा म्हटलं की, राजधानी छ. संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) असणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा उल्लेख येतोच. संभाजीनगरला (औरंगाबाद) लेण्यांचा जिल्हा म्हटलं जातं. या दोन्ही ठिकाणांना १९८३ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभलाय. वर्षभरात या दोन्ही लेण्यांना स्थानिक आणि परदेशी मिळून दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात अशी इथे नोंद आहे.
अजिंठ्यात एकूण २९ लेण्या आहेत. या सर्व लेण्या विशेषतः बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांच्या असून इथे लेण्यांत गौतम बुद्धांचे जीवनप्रसंग देखील कोरले आहेत. १९५१ मध्ये भारत सरकारद्वारे वेरूळच्या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं गेलं. तर वेरूळचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू, बौद्ध व जैन लेणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. पावसाळ्यात या लेणींना भेट देण्याचा फायदा म्हणजे पावसाळ्यात अजिंठा लेण्यांच्या सभोवतालचा निसर्ग हिरवाईने नटून जातो. तसेच या ठिकाणचे खास आकर्षण असलेला ‘सप्तकुंड’ धबधबा भरून कोसळत असतो. छोट्या छोट्या कुंडामधून वाहत रौद्ररूप धारण करत हा धबधबा खालच्या प्रवाहात कोसळतो. तसेच वेरूळ इथल्या लेणीच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. ह्या भागात पर्यटकांसाठी ज्या सोयी आहेत, त्याला अत्याधुनिक करणे ही काळाची गरज आहे.
नाथसागर, पैठण | Nathsagar, Paithan
गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. नाथसागर या नावाने परिचित असलेलं जायकवाडी धरण छ. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती या जायकवाडी धरणाची आहे. या धरणाचं बांधकाम १९६५ ते १९७६ असं जवळपास ११ वर्ष चाललं होतं. या नाथसागर धरणावर मराठवाड्यातील तब्बल ५ जिल्हे अवलंबून आहेत. छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना धरणाचं पाणी जातं. म्हणूनच या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असं देखील म्हटलं जातं.
या ठिकाणची आणखी एक ओळख म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. देश-विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी या पक्षी अभयारण्यात येतात. यासोबतच पैठण हे संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे. त्यांची समाधी इथेच आहे. वारकरी तसेच महानुभाव पंथाचे लोक पैठणला भेट देतात. तसेच पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे, जिथं जगप्रसिद्ध पैठणी, हिमरू शाली देखील मिळतात. खर तर अश्या निसर्ग रम्य भागासाठी विदेश आणि देशातील लोकांना या ठिकाणी बोलवून प्रसार व प्रचार करायला पाहिजे. या माध्यमातून अधिक प्रगत विचार निसर्गाबाबत तयार होतील. नव्या पीढीला देखील यातून प्रेरणा मिळेल.
म्हैसमाळ हिल स्टेशन | Mhaismal Hill Station
म्हैसमाळ हे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. म्हैसमाळ पावसाळ्यात हिरवाईनं नटून जातं. त्यामुळं पावसाळ्यात म्हैसमाळ पर्यटकांना आकर्षित करतं. खुलताबादपासून सुमारे १२ किमी आणि संभाजीनगर शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. वाटेत वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि देवगिरी किल्ला आहे. म्हैसमाळ मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. म्हैसमाळ हा सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग असून इथे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. विविध प्रजातीच्या वनस्पती तसेच फुलं इथे बघायला मिळतात. या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी इथे असलेल्या वनस्पती कार्यशाळेला नक्की भेट द्या. पावसाळ्यात तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवागार निसर्ग आणि सगळीकडे पसरलेले ढग डोळ्यांचं पारणं फेडतात. वर्षभरात इथलं किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत असतं.
म्हैसमाळ हे शंकराच्या पुरातन मंदिराच्या अवशेषाचंही ठिकाण आहे. पूर्वीचे महेशमाळ असं असलेलं नाव नंतर अपभ्रंश होत म्हैसमाळ असं झालं. इथल्या पठारावर गिरजा देवीचं मंदिर व बालाजी मंदिर आहे. इथून घृष्णेश्वर मंदिर अवघ्या १४ किमी अंतरावर आहे तर खुलताबादेतील भद्रा मारोती मंदिर १२ किमी अंतरावर आहे. पर्वत रांगा आणि आसपासच्या सर्व भागात आपण अधिक कार्यक्षम व पर्यावरणपूरक पर्यटन तयार करु शकतो.
सहस्त्रकुंड धबधबा | Sahastrakund Waterfall
Sahastrakund Waterfall
नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडपासून १00 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ‘इस्लामपूर पाटी’ पासून ५ किमी तर किनवटपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे धबधब्याच्या अलीकडे मराठवाड्याची जमीन आणि धबधब्याच्या पलीकडे विदर्भाची जमीन आहे. त्यामुळे धबधब्याचा अलीकडचा भाग किनवट तर पलीकडचा भाग उमरखेड तालुक्यात येतो. नांदेड जिल्हा कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळं सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून देखील पर्यटक येत असतात. सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर असलेलं पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. तसेच काठावर असणारा सुंदर बगिचा, येथील जंगल, वन्य प्राणी आणि विविध प्रजातींची फुलपाखरे देखील पाहायला पर्यटक गर्दी करतात. पण म्हणावा तसा विकास न झाल्यामुळे हा भाग अजूनही सुख सुविधांपासून वंचित आहे. या क्षेत्राकरिता अधिक वैज्ञानिक दृष्टीकान विकसित करण्याची आवश्यकता आहे.
माहुरची रेणुकामाता | Renuka Mata Temple Mahurgad
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं माहुरच्या रेणुकामातेचं मंदिर इथून ७० किमी अंतरावर आहे. नांदेड - गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे शीख धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. परळी वैजनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. ह्या क्षेत्रासाठी अधिक सोयी करणं गरजेचं आहे. जसे चांगले रस्ते, नवोन्मेष ब्लॉकचेन पद्धती तयार करणे, भारतातील अशा ठिकाणांची माहिती समाज प्रबोधनाकरिता तयार करणे, इत्यादी.
मराठवाडा हा केवळ दुष्काळ, पाणीटंचाई आणि ऐतिहासिक स्मारकांचा प्रदेश नाही; तर निसर्ग, संस्कृती, अध्यात्म आणि जैवविविधतेचा अनोखा संगम आहे. पावसाळ्यात खुलणारे धबधबे, हिरवाईने नटलेली डोंगररांग, जागतिक वारसा स्थळे आणि धार्मिक केंद्रे यामुळे हा प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीनं मोठी क्षमता बाळगून आहे. योग्य नियोजन, पर्यावरणपूरक पर्यटन, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रभावी प्रचार यांद्वारे मराठवाडा महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकू शकतो.
तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏
मृणालिनी फडणवीस
माजी कुलगुरू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ
संचालक, अकॅडमिक्स, केसीई सोसायटी, जळगाव


.png)
Very good article.
ReplyDeleteछान लिहिले
ReplyDelete