सज्जनांना शक्तीशाली बनण्याची प्रेरणा देणारा सज्जनगड शिव-समर्थांच्या पवित्र स्मृतींचा प्रवास | Sajjangad Travel Guide | Author: Sakhi | Forts in Maharashtra | Maharashtra Tourism

सज्जनगडाची एकएक पायरी चढत असताना मन केव्हा इतिहासाच्या त्या सोनेरी पानांमध्ये शिरलं कळलच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा येथे कसं वातावरण असेल, पुढे रामदास स्वामी राहण्यास आल्यावर किल्ल्यावरील दिनचर्या कशी राहात असेल? महाराज आणि स्वामींच्या भेटीगाठी कशा होत असतील? गडाचा इतिहास पुस्तकांमधून वाचला होता. पण आज प्रत्यक्ष या ऐतिहासिक गडाच्या पायथ्याशी उभं असताना सगळं कसं रोमांचक वाटत होतं. इतिहासातील प्रत्येक क्षणाची जणू मी नव्यानं साक्षीदार ठरत होते.

आदिलशाही मुलूखातील हा किल्ला २ एप्रिल १६७३ रोजी शिवछत्रपतींनी जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण झालं सज्जनगड. समर्थ रामदासांनी जी अनेक नावं धारण केली होती त्यामध्ये रामी रामदास, सज्जन आणि उदास ही नावं प्रसिद्ध होती. त्यामुळं छत्रपतींनी या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं ठेवलं होतं.

Sajjangad

मुळात हा परळीचा किल्ला म्हणजे प्राचीन काळची अश्वलायन ऋषींची तपोभूमी. त्यामुळं त्याचं मूळ नाव होतं अश्वलायन गड. पुढे अश्वलायन शब्दाचा अपभ्रंश होऊन हा किल्ला ‘अस्वल गड’ या नावानं ओळखला जाऊ लागला. ११ व्या शतकात शिलाहारांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. त्यावेळी तो ‘परळीचा किल्ला’ अथवा ‘परळी गड’ या नावानं ओळखला जात असे. इ.स. १३५८ ते १३७५ या काळात हा किल्ला चौथ्या बहामनी राजाच्या ताब्यात होता. तशा ऐतिहासिक नोंदी आहेत.

पुढे ९ जून १७०० रोजी औरंगजेब बादशहानं हा किल्ला पुन्हा जिंकला आणि त्याचं नाव ‘नवरसतारा’ असं ठेवलं. १७०९ साली हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. तेव्हा छत्रपती शाहु महाराजांनी या किल्ल्याचं नामकरण पुन्हा सज्जनगड असं केलं. तेव्हापासून हा किल्ला आजतागायत सज्जनगड या नावानं ओळखला जातो. दरम्यान १८१८ साली इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. परंतु तो मराठ्यांच्या ताब्यात असल्यासारखाच होता.

सज्जनांनी शक्तीशाली बनलं पाहिजे अशी प्रेरणा देणारा हा सज्जनगड असंख्य देशभक्तांचं स्फूर्तीकेंद्र ठरला आहे, याची जाणीव तो सर करताना मनात होतीच.

समर्थांचं सज्जनगडावर आगमन | When did Samarth Ramdas arrive on Sajjangad

वाकेनिसी टिपणातील नोंदीनुसार समर्थ रामदास सर्वप्रथम १६५० साली गडावर आले होते. त्याचवेळी अंगापूरच्या डोहात सापडलेली अंगाई देवीची मूर्ती त्यांनी येथं स्थापन केली होती. त्यावेळी समर्थांचं जास्तीतजास्त वास्तव्य सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावाच्या बाहेर उर्वशी नदीच्या तीरावर होतं. परळी गावात समर्थांनी स्थापन केलेला मारुती आजही दिमाखात उभा आहे. समर्थांनी बाग प्रकरण हे काव्य याच परळी खोऱ्यात लिहिलंय. याचठिकाणी दासबोध ग्रंथ लिहावा असाही समर्थांचा मानस होता. पण १६५२ साली चंद्रराव मोरे आणि अफझलखान वध या महत्त्वाच्या घटनांवेळी शिवछत्रपतींना मदत करण्यास आठ वर्ष ते शिवथर घळीत राहिले. तिथेच त्यांनी दासबोध ग्रंथ लिहिला. १६७२ ते १६७६ या काळातही समर्थ शिवथर घळीतच राहात होते. परंतु १६७३ साली दक्षिण दिग्विजयाला जाताना शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत समर्थांची भेट घेतली आणि उतारवयात फार दगदग न करता सज्जनगडावर राहून विश्रांती घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.

त्यावेळचे सज्जनगडचे किल्लेदार जिजोजी काटकर यांना १६७६ साली पत्र पाठवून सज्जनगडावर समर्थांची उत्तम व्यवस्था ठेवण्याची आज्ञा महाराजांनी केल्याची नोंद आजही उपलब्ध आहे. समर्थांचं परळी खोऱ्यावर प्रेम होतं. पाडळी, चाफळ, वासोटा, महाबळेश्वर, माहुली ही त्यांची आवडीची ठिकाणं, सज्जनगडापासून फार दूर नव्हती. म्हणून समर्थांनी शिवछत्रपतींची विनंती मान्य केली आणि १६७६ साली ते कायमचे सज्जनगडावर वास्तव्यास आले. त्यावेळी हत्तीवर भव्य मिरवणूक काढून ग्रामस्थांनी त्यांना वाजतगाजत गडावर आणलं होतं, असं सांगतात.

हा सगळा इतिहास आठवत असताना २५० पायऱ्या चढून आपण सज्जनगडावर केव्हा पोहोचलो हे मला कळलं सुद्धा नाही. विशेष म्हणजे गड चढत असताना दोन्ही बाजूला स्थापित मारुतीच्या मूर्तींचं दर्शन ऊर्जादायी होतं.

मुख्य प्रवेशद्वारातून आत बघितलं की पहिलं दर्शन होतं ते समर्थांचा मठ आणि शेजघराचं. शिवछत्रपतींनी मोठी रक्कम खर्च करुन समर्थांसाठी हे निवासस्थान बांधलं होतं. विशेष म्हणजे राज्याभिषेकानंतर महाराज येथे समर्थांसोबत दीड महिना वास्तव्याला होते. संभाजी महाराज सुद्धा येथे दोन महिने राहिले आहेत. समर्थ रामदास या मठात सहा वर्षं राहिले. त्यामुळं या वास्तुचं पावित्र्य आजही जपलं जातं. तेथील समर्थांच्या प्रत्येक वस्तूत जिवंतपणा जाणवत होता.

समर्थांची विश्रांतीची खोली मठात डाव्या बाजूला दिसते. ‘श्री समर्थांचे शेजघर’ असा फलक या खोलीच्या दाराजवळ लावलेला दिसतो. याशिवाय समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू या शेजघरात अतिशय काळजीपूर्वक आणि आदराने जतन करण्यात आलेल्या आहेत. या खोलीतील मोठा पलंग खुद्द शिवछत्रपतींनी समर्थांना दिला होता,असं सांगतात. मूळ पलंग पूर्ण लाकडी होता. कालांतराने त्याचे पाय खिळखिळे झाल्याने भक्तांनी तिथे पितळेचे स्तंभ बसविले आहेत. समर्थ रामदास याच पलंगावर चटई टाकून विश्रांती घेत असत. अलिकडे भक्तांनी पलंगावर गादी आणि उश्या आणून ठेवल्याचं दिसतं. याच पलंगावर समर्थांचं एक चित्र ठेवलेलं आहे. 
Samarth Ramdas

हे चित्र प्रत्यक्ष समर्थांना बघून त्यांचे शिष्य भीमस्वामी तंजावरकर यांनी काढलं आहे. समर्थांचं हे अधिकृत चित्र असल्यानं त्यांच्या देहयष्टीची कल्पना त्यावरुन येते. त्यांच्या पलंगाची लांबी ६ फूट ८ इंच आहे.

शेजघरात एक लाकडी स्टॅण्ड आहे. या स्टॅण्डमध्ये समर्थांच्या वापरातील चार वस्तू ठेवल्या आहेत. त्यात आहे छत्रपतींनी दिलेली कुबडी, श्रीदत्तात्रयांनी दिलेली कुबडी, वेताची काठी आणि सोटा. गंमत म्हणजे शिवाजी महाराजांनी जी कुबडी दिली आहे त्यात तलवार आहे. त्याला गुप्ती म्हणतात. गडावरील सेवकांना विनंती केल्यास ते ही गुप्ती दाखवतात. येथे जो सोटा आहे तो मच्छिंद्रनाथांनी समर्थांना भेट दिला होता. या चारही वस्तु बघितल्यावर समर्थांचा पुरुषार्थी आणि पराक्रमी स्वभाव लक्षात येतो. समर्थ केवळ देवदेवतांना हातात शस्त्र घेण्याचं आवाहन करत नसत तर स्वत:ही ते काळाची गरज बघता शस्त्रधारी झाले होते. फरक एवढाच की त्यांच्या शस्त्रांना शास्त्राची जोड होती. कुबडीचा वापर समर्थ उभ्यानं जप करताना बगलेत ‘अडाणी’ म्हणून करीत असत. प्राणायाम करताना बगलेतील कुबडीच्या दबावाद्वारे सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांचं संचलन समर्थ करीत असत. पलंग आणि या कुबडीच्या उंचीवरुन समर्थ किमान सहा फूट उंच असावेत, असं लक्षात येतं.

शेजघरात दोन भलेमोठे हंडे आहेत. समर्थांचे लाडके शिष्य कल्याणस्वामी याच हंड्यांतून दररोज समर्थांसाठी परळी गावातून उर्वशी नदीचं पाणी आणत असत. समर्थांना कफ होत असे आणि वैद्यांनी त्यांना जिवंत पाणी वापरायला सांगितलं होतं. गडावर पाण्याचं तळं आहे पण जिवंत पाण्याचा झरा नाही. हे दोन हंडे आपल्यासारख्यांना रिकामे उचलणं सुद्धा कठीण आहे. त्यावेळी कल्याणस्वामी कावड करुन दोन्ही हंडी एकाच वेळी भरुन आणत. यावरुन त्यांच्या बळाची कल्पना यावी.

या हंड्याच्या वरच्या बाजूला असलेली वल्कने समर्थांनी वापरलेली आहेत. असं सांगतात की, भारतभ्रमण करत असताना समर्थ हिमालयात पोहोचले. तेथे त्यांना थंडीचा त्रास होऊ लागला. तेव्हा साक्षात मारुतीराय प्रकट झाले आणि त्यांनी शरीर संरक्षणासाठी ही वल्कने समर्थांना दिली. याशिवाय समर्थांचा पाणी पिण्याचा पितळी लोटा, पिकदाणी पलंगाजवळ ठेवलेली आहेत. कफाचा त्रास असल्यानं समर्थ विडा खात असत. म्हणून ही पिकदाणी. पिकदाणी शेजारी ठेवलेला पानाचा डबा बघून थोड आश्चर्य वाटलं. कारण तो बऱ्यापैकी मोठा आहे. शेजघरातच कट्ट्यावर राममूर्तींचा ओटा आहे. येथील राममूर्ती समर्थ समाधी मंदिराच्यावर बांधण्यात आलेल्या राममंदिरात संभाजी महाराजांनी प्रतिष्ठित केल्या. समर्थांच्या पलंगासमोर एक अग्निकुंड सुद्धा आहे. त्यावरुन समर्थ सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी अग्नीची उपासना करत असावेत असं वाटतं.

मी गडावर पोहोचले तेव्हा सकाळचे साडेनऊ- दहा वाजले असतील. मठाच्या परिसरात सेवकांची लगबग सुरू होती. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होता. तरीही मी त्यापैकी एकदोन सेवकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. समर्थांच्या काही आठवणी, ते असताना गडावरील दैनंदिन याबाबत त्यांच्याकडून थोडबहुत जाणून घेता आलं.

कशी होती समर्थांची दिनचर्या

सज्जनगडावर स्वामी समर्थांचे वास्तव्य असताना त्यांची दैनंदिनी अत्यंत साधी, नियमित आणि अध्यात्मप्रधान होती.

पहाटेच्या मंगलवेळेत सज्जनगडावरील वातावरण प्रसन्न आणि शांत असे. स्वामी समर्थ ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यान, जप आणि ईश्वरचिंतनात मग्न होत. गडावरील मंद वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि परिसरातील आध्यात्मिक वातावरण यामुळं साधनेस अनुकूल अशी दिव्य अनुभूती निर्माण होत असे. स्नान व नित्यकर्म पूर्ण झाल्यानंतर ते देवदर्शन घेत आणि नामस्मरण करीत. अनेक वेळा ते गहन ध्यानावस्थेत बसत असत. त्यांच्या सहवासासाठी आलेले साधू, भक्त आणि ग्रामस्थ त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करीत. समर्थ प्रत्येकाशी संवाद साधत. काहींना अध्यात्ममार्गाचे मार्गदर्शन, काहींना व्यवहारातील अडचणींवर उपाय, तर काहींना केवळ कृपादृष्टी देत असत. दुपारच्या वेळी साधं आणि सात्त्विक भोजन घेतलं जाई. अनेकदा ते स्वतः अल्पाहार करीत आणि इतरांना अन्नदानाचे महत्त्व सांगत. त्यांच्या आसपास सदैव सेवेकरी व भक्तगण उपस्थित असत. भोजनानंतर काही काळ विश्रांती अथवा मौन चिंतन होत असे.

Sajjangad, Satara

सायंकाळी पुन्हा भक्तांचा मेळा जमू लागे. नामस्मरण, भजन, कीर्तन किंवा धर्मचर्चा यामध्ये वेळ व्यतीत होत असे. स्वामी समर्थांचं बोलणं अनेकदा थोडक्यात पण अर्थगर्भ असे. त्यांच्या वचनांमधून वैराग्य, भक्ती, सदाचार आणि गुरुभक्तीचा संदेश मिळत असे. रात्री उशिरापर्यंत काही भक्त त्यांच्याजवळ बसून आध्यात्मिक प्रश्न विचारत. समर्थ योग्य वेळी मार्गदर्शन करून भक्तांच्या मनातील शंका दूर करीत. दिवसाचा शेवट ईश्वरस्मरण, ध्यान आणि अंतर्मुख चिंतनाने होत असे. त्यांचा दिनक्रम वैभवापेक्षा साधेपणा, कर्मापेक्षा भक्ती, आणि बाह्य आडंबरापेक्षा अंतः करणातील ईश्वरनिष्ठा यावर आधारित होता. त्यांच्या प्रत्येक कृतीतून भक्तांना अध्यात्म, सेवा, करुणा आणि सदाचार यांची प्रेरणा मिळत असे.

विजयादशमीच्या दिवशी समर्थ घोड्यावर बसून सीमोल्लंघन करीत असत. दसऱ्याच्या निमित्तानं अनेक मराठा सरदार आपआपले घोडे सजवून सज्जनगडावर येत असत. त्यापैकी सर्वात चांगल्या घोड्याची निवड समर्थ करीत असत. आणि ज्या सरदाराचा घोडा समर्थ सीमोल्लंघनासाठी निवडत त्याला शिवाजी महाराज घोडदळात बढती देत असत. आज समर्थ शरीराने गडावर नसले तरी विचाररुपात ते येथे आहेत. गडावर दररोज १२ वाजता महाप्रसाद असतो.

समर्थांचे अखेरचे दिवस

समर्थ सज्जनगडावर राहण्यास आल्यावर दुसऱ्याच वर्षी १६७७ साली त्यांच्या थोरल्या बंधुंनी मराठवाड्यात दहीफळ येथे देह ठेवला. त्यांच्या लाडक्या शिष्या वेणास्वामी १६७८ साली आपल्या मूळ स्वरुपात विलिन झाल्या. हे आघात समर्थ पचवित होते. परंतु ३ एप्रिल १६८० या दिवशी चैत्र शुद्ध पौर्णिमेला रायगडावर शिवछत्रपतींनी अखेरचा श्वास घेतला. आणि या घटनेनं समर्थ पार कोलमडले. त्यांनी अन्नपाणी सोडलं. शिष्यांच्या आग्रहाखातर थोडीशी फळं आणि दूध घेत असत. शिवाजी महाराजांच्या पश्च्यात समर्थ पावणे दोन वर्ष होते. पण या काळात ते जेवले नाहीत. शेजघरातून बाहेर देखील पडले नाहीत. यावरुन उभयतांमध्ये किती आत्मियता होती, ते दिसून येतं. ‘Shivaji and Ramdas were two bodies but one soul’ असं डेमिंग नामक इतिहास संशोधकानं लिहून ठेवलय.

२२ जानेवारी १६८२ रोजी समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. ही वार्ता कळताच रायगडावरुन संभाजी महाराज तातडीनं सज्जनगडावर आले. येथं आल्यावर त्यांना कळलं की ज्या ठिकाणी समर्थांचे अग्निसंस्कार झाले त्याठिकाणी तिसऱ्या दिवशी समर्थांची स्वयंभू समाधी जमिनीतून वर आली. संभाजी महाराजांनी समर्थांचं भव्य समाधी मंदिर बांधावयाचं ठरवलं. परंतु समर्थांनी देह ठेवताना सांगितलं होतं, ‘ माझे चिता स्थानी मंदिर बांधू नये, रघुवीरांचे देवालय बांधावे. माझे महत्त्व वाढवू नये, रघुवीरांचे महत्त्व वाढवावे.’ संभाजी महाराजांनी समर्थांची अखेरची इच्छा पूर्ण केली. सज्जनगडवर त्यांनी श्रीरामाचं सुंदर मंदिर उभं केलं. त्याखालीच भूयारात समर्थांचं समाधी मंदिर आहे. रामाचं दर्शन घेऊन उजवीकडे जिन्यानं खाली उतरलं की समर्थांच्या समाधीचं दर्शन होतं. त्या समाधीपुढं नतमस्तक होत मी थोडावेळ तिथं शांत बसून राहिले. ती वेगळीच अनुभूती होती.

Manache Shlok

मारुतीची दोन मंदिरं

सज्जनगडावर मारुतीची दोन मंदिरं आहेत. त्यापैकी एक मंदिर श्रीधर कुटीच्या समोर असून त्याला पेठेतील मारुती म्हणतात. समर्थांच्या काळात गडावरील पेठ त्याठिकाणी होती. येथे बसूनच समर्थ प्रभु रामचंद्राचं चिंतन करीत असत. येथील हनुमंताचं मुख उघडं आहे. दुसरा धाब्याचा मारुती हा समाधी मंदिराच्या मागील बाजूस पश्चिमेच्या तटबंदीजवळ आहे. पश्चिमेकडून शत्रुचं आक्रमण होऊ नये म्हणून हे देवालय स्वत: समर्थांची उभं केलं आहे. शत्रुचे धाबे दणाणणारा म्हणून याला धाब्याचा मारुती म्हणतात. गडच्या पूर्वेकडील टोकाला अंगाई देवीचं मंदिर आहे. ही अंगाई देवी म्हणजे समर्थांची कुलस्वामिनी तुळजाभवानी होय. या अंगाई देवीच्या मंदिरातच समर्थ आणि शिवरायांच्या गुप्त बैठका होत असत, असं सांगितलं जातं. राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे अनेक बेत शिवसमर्थांनी या देवीच्या साक्षीनं आखले.

धाब्याच्या मारुतीजवळील ब्रह्मपिसा स्मारक, कल्याण उडी स्मारक, श्रीआक्कास्वामी समाधी वृंदावन, श्रीवेण्णास्वामी समाधी वृंदावन, श्रीगोमाता व प्रतापमारुती मंदिर हे सगळं बघत असताना तीनचार तास लागतात.

रामघळ गुफा

सज्जनगडावरुन २०० पायऱ्या उतरल्या की गाय आणि मारुती यांचं मंदिर लागतं. ही मंदिरे थोर समर्थ भक्त गोजीवनदास चौंडे महाराज यांनी स्थापन केली आहेत. या मंदिरांना लागूनच डोंगरात एक पायवाट जाते. ही पायवाट रामघळीच्या दिशेनं जाते. रामघळ ही डोंगरातील गुफा असून आतमध्ये आठ ते दहा माणसं बसू शकतील, एवढी खोली आहे. अर्थात अलिकडे या घळीचा वापर होत नाही. तिथं खूपसारी वटवाघुळं असतात,असं कळलं. या घळीत संपूर्ण अंधार असल्यानं ज्यांना घळ बघायची आहे त्यांना बॅटरी घेऊन जावं लागतं. विशेष म्हणजे या घळीची उंची फक्त साडेतीन ते चार फूट आहे. त्यामुळं आत सरपटतच जावं लागतं. सज्जनगडावर येणारे उत्साही तरुण घळीत आवर्जुन जातात. पण मी मात्र ती हिम्मत केली नाही.

देशभक्तांचं स्फूर्तीस्थान

सज्जनगड हे नेहमीच देशभक्तांचं स्फूर्तीस्थान राहिलं आहे. लोकमान्य टिळक थोर समर्थ भक्त होते. समर्थांच्या दर्शनासाठी ते नेहमी गडावर येत. दासबोधाच्या वाचनाने त्यांना प्रेरणा मिळत असे. स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, गोपाळकृष्ण गोखले यांच्यासह अनेक देशभक्तांनी सज्जनगडावरील समर्थांची समाधी आणि दासबोध यातून प्रेरणा घेतली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशीच प्रेरणा मिळत असावी. गडावरुन खाली उतरल्यावर निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सज्जनगड डोळ्यात साठवून घेताना समर्थांना समकालीन असणारे त्यांचे शिष्य कवी अनंत यांच्या ओळी आठवल्या. ते म्हणतात,

सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगा परी
नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी
साकेताधिपती कपि भगवती, हे देव ज्याचे शिरी
तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी

संदर्भ: सज्जनगडाचा इतिहास, सुनील चिंचोलकर

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा. 📖 


सखी
लेखक

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

पचमढीत राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !! | Author: Amit Naseri | Pachmarhi Travel Experience | Incredible India

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

पंचानन गणेश | Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha