चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India
पुरातत्त्व संशोधन आणि पर्यटनाला मिळणार नवी दिशा
चंद्रपूर म्हटले की गोंड राजांची राजधानी, किल्ला आणि मध्ययुगीन इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र येथील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील ‘बोर रीठ’ या स्थळावरील संशोधनामुळे चंद्रपूरचा इतिहास आणखी हजारो वर्षे मागे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनानुसार या परिसरात पाषाणयुग, सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील मानवी वस्तीचे पुरावे आढळले आहेत. या दाव्यांची अधिकृत पुरातत्त्वीय पडताळणी आणि उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या इतिहासाला नवे परिमाण मिळू शकते. त्याचबरोबर हे स्थळ विदर्भातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याचीही मोठी संधी आहे. या संशोधनाबद्दल प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा
चंद्रपूर हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. नैसर्गिक संपत्ती, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धा, वैनगंगा आणि इरई नदीच्या परिसरात वसलेले हे शहर प्राचीन काळापासून मानवी वस्तीचे केंद्र राहिले आहे.
Stone Age Vessels in Chandrapur
प्राचीन काळात हा प्रदेश दक्षिण भारत आणि मध्य भारत यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर असल्यामुळे व्यापार, संस्कृती आणि धर्म यांची देवाणघेवाण येथे होत असे. सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट यांसारख्या राजघराण्यांच्या प्रभावाखाली हा प्रदेश काही काळ होता. या काळात शेती, व्यापार, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक जीवनाचा विकास झाला. वेळोवेळी झालेल्या संशोधनातून या शहराच्या प्राचीनतेबाबत आजवर अनेक रोचक खुलासे झाले आहेत.
संशोधनाच्या याच श्रृंखलेत आता चंद्रपुरातील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ पूर क्षेत्राच्या बाहेर अतिप्राचीन गावाचे संशोधन करताना बोर नावाचे मूळ चंद्रपूरचे एक नष्ट झालेले गाव आढळले आहे. एक इतिहास अभ्यासक म्हणून मी या ठिकाणी अनेक दिवसांपासून अभ्यास करीत होतो. यातून मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की, संगमाजवळ आढळलेले हे प्राचीन गाव १० हजार वर्षांपूर्वीचे पाषाण युगीन आदीमानव, २ हजार वर्षांपूर्वीचे सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील असावे. आज हे गाव बोर रिठ म्हणून गावकऱ्यांना माहिती असून ते गवळी गाव असेल असे त्यांना वाटते. परंतु माझ्या संशोधनात तिथे १० हजार वर्षापूर्वीची पाषाणयुगीन अवजारे, ३ हजार वर्षादरम्यानच्या दगडांच्या वस्तू, २ हजार वर्षांपूर्वीची मडकी, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळणाऱ्या भट्टीचे लोह खडक आढळले आहेत.
मंदिराचे अवशेष | Temple Remains in Chandrapur
येथे प्राचीन काळात एक मंदिर होते. त्यातील दोन शिवलिंग आणि मंदिराचे काही अवशेष सुद्धा तिथे पडलेले असून हनुमान मंदिर अलीकडच्या काळातील बांधलेले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी येथे प्राचीन नाणी आणि अलंकार सापडल्याची माहितीही दिली आहे. या परिसरात आज शेती होत असली तरी अनेक ठिकाणी जुन्या बांधकामांचे (घरांचे) ढिगारे आणि मातीचे उंचवटे दिसून येतात. त्यामुळे येथे पूर्वी मानवी वस्ती अस्तित्वात असावी, अशी शक्यता बळावते. अजून उत्खनन केल्यास अनेक पुरावे मिळू शकतात, असे माझे ठाम मत आहे. मी पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांना इथे अभ्यास करण्याचे निमंत्रण सुद्धा दिलेले आहे.
इराई आणि झरपट या नद्या प्राचीन काळापासून मानवी वस्तीला पोषक ठरल्या असाव्यात. दाताळा, नागाळा, देवाडा, आरवट तसेच पापामिया टेकडी परिसरातही प्रागैतिहासिक आणि प्राचीन संस्कृतीचे संकेत देणारे अवशेष आढळतात. या सर्व स्थळांचा एकत्रित अभ्यास केल्यास चंद्रपूर परिसरातील मानववस्तीचा इतिहास हजारो वर्षे मागे नेणारे पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 'बोर रिठ' येथे पाषाणयुगापासून सातवाहन, वाकाटक आणि यादव काळापर्यंतच्या विविध कालखंडांतील पुराव्यांचे संकेत आढळत असल्याने हे स्थळ संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.
५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती
झरपट आणि इराई नदीच्या काठावर पाषाणयुगीन काळात, मध्य पाषाण युगात ५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती होती. पुढे ५ हजार वर्षांपासून येथे आदिवासी वस्ती करून राहायला लागले. पूर्वी सर्वत्र बारमाही नद्यांजवळच गावे असायची. ३ हजार वर्षांपूर्वी झरपट नदीजवळ पापामिया टेकडीजवळ(आजचे मेडिकल कॉलेज) गाव होते. इराई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेजजवळ तसेच पठाणपुरा गेटच्या जवळ केवळ १.२ किमी अंतरावर आणि संगमापासून १ किमी अंतरावर बोर रीठ आहे. संगमाजवळ सुद्धा एक माना गाव होते. बहुदा लालपेठ, बाबूपेठ कदाचित ह्याच गावांना हिंदू काळात लोकपूर आणि इंदूपूर म्हणत असावे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजांपूर्वी भद्रावती आणि भटाडा हे सर्वात मोठे गाव आणि व्यापार केंद्र होते, तसेच चंद्रपूर येथे सुद्धा पूर क्षेत्राच्या बाहेर आदिवासी गावे, हिंदू गावे होती.
Stone Age Vessels in Chandrapur
पाषाणयुगीन वस्ती
चंद्रपूर शहराचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की, इराई आणि झरपट या दोन नद्यांमुळे येथे मोठ्या संख्येने पाषाणयुगीन आदिमानव राहत होते. दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट ह्या सर्व क्षेत्रात देशातील सर्वात मोठे पाषाणयुगीन स्थळ असून इथे मला सर्वाधिक पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत. त्याच प्रकारे झरपट नदीच्या आधारे पापामियाजवळ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाषाणयुगीन स्थळ आढळले. इथेसुद्धा एक गाव होते कारण ह्याच ठिकाणी शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प मला सापडले आहे. या वस्त्या पाच ते दोन हजार वर्षादरम्यान तयार झाल्या.
सातवाहन ते यादव काळ
आजच्या चंद्रपूर जवळील प्राचीन वस्ती हे बोर रिठ आहे. कारण इथे एकाच ठिकाणी पाषाण युगीन अवजारे, २००० वर्षापूर्वीचे सातवाहनकालीन पुरावे, दीड हजार वर्षांदरम्यानचे वाकाटक आणि बाराव्या शतकानंतरचे यादव कालीन पुरावे आढळले आहेत. त्यावरुन बोर रिठ हे सर्वाधिक प्राचीन आणि आजच्या चंद्रपूर शहराचे मूळ गाव आहे असे पुराव्या वरून कळते. प्राचीन काळात चंद्रपूर परिसरावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांसारख्या अनेक राजघराण्यांचा प्रभाव होता. वाकाटकांच्या काळात विदर्भात कला, साहित्य आणि धर्म यांची मोठी भरभराट झाली. या काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांचा प्रभाव या प्रदेशात वाढला. परिसरात मंदिरे, शिलालेख आणि धार्मिक केंद्रांची निर्मिती झाल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत.
गोंड राजे ते भोसले
चंद्रपूरच्या इतिहासात गोंड राजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तेराव्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केली आणि येथे राजधानी वसवली. त्यांनी शहराभोवती मजबूत दगडी तटबंदी, भव्य प्रवेशद्वारे आणि किल्ल्याची उभारणी केली. आजही चंद्रपूरचा किल्ला, तटबंदी आणि ऐतिहासिक दरवाजे गोंड स्थापत्यकलेची साक्ष देतात. गोंड राजांच्या कारकीर्दीत कला, संस्कृती, प्रशासन आणि व्यापार यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला.
अठराव्या शतकात मराठ्यांनी चंद्रपूरवर सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर ब्रिटिश काळात शहराचा प्रशासकीय आणि औद्योगिक विकास झाला. कोळशाच्या खाणी, जंगलसंपत्ती आणि वाहतूक व्यवस्था यांमुळे चंद्रपूरचे आर्थिक महत्त्व वाढले. स्वातंत्र्यानंतर हे शहर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक बनले.
गोंडकालीन, भोसले आणि ब्रिटिशकालीन इतिहास आज माहिती असला तरी चंद्रपूरचे मूळ गाव हे बोर रिठ हेच असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत. आज मी ज्या पद्धतीने ग्रामीण भागात शोध आणि संशोधन करीत आहे त्यावरून अनेक नवी माहिती आणि नवे पुरावे मिळत आहेत.
पर्यटनासाठी नवे आकर्षण | Heritage Tourism Opportunity in Chandrapur
आज चंद्रपूरमध्ये येणारे बहुतांश पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, प्राचीन किल्ला आणि धार्मिक स्थळांना भेट देतात. भविष्यात 'बोर रिठ' आणि इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा जतन करून त्याचा विकास करण्यात आला, तर हे ठिकाण इतिहास, पुरातत्त्व आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक वेगळे पर्यटनस्थळ बनू शकते.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.
प्रा. सुरेश चोपणे
इतिहास अभ्यासक आणि संशोधक
चंद्रपूर




Comments
Post a Comment
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️