दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, यानिमित्त देशभरातून असंख्य भाविक त्यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमीवर येत असतात. डॉ. बाबासाहेबांच्या धम्मचक्रातून निर्माण झालेली ही दीक्षाभूमी म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नव्हेतर मानवाने निर्दोष जीवन कसे जगावे याची ती पथदर्शक आहे. मानवाच्या जगण्याचे अधिष्ठान असणारी ही भूमी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेबरोबरच प्रज्ञा, शील करुणा आणि मैत्रीचा आनंद चाखायला देणारी रम्य बाग आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या विचारांनी ती फुलवलेली आहे. या भूमीतून मानवाची जीवनाची व जगण्याची ऊर्मी आणि अखंड उर्जेचा झरा कायम वाहात असतो.
१४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षेपूर्वी पडिक असलेली ही जागा निव्वळ खाचखळणे, दगडधोंडे, लहानमोठी झाडेझुडपे आणि गवताचे रान होती. परंतु डॉ. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर ही भूमी विचारांचे उर्जास्रोत बनली.
भारतीय संविधानानंतरच्या काळात दीक्षाभूमीचा उदय झाला आणि संपूर्ण भारतीय समाजाला नव्या विचारांचे, नव्या प्रेरणेचे, नव्या नैतिक मूल्यांचे पाठबळ मिळत गेले. यातूनच पुढे या देशात नव्या सांस्कृतिक व प्रबोधनवादी चळवळीचा प्रारंभ झाला.
दीक्षाभूमी एक उर्जास्थान | Deekshabhoomi Nagpur Stupa
नागपुरातील दीक्षाभूमी हे जगभरातील बौद्ध अनुयायांचे एक महत्वाचे केंद्र आहे. प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळेच या स्थानाला दीक्षाभूमी संबोधले गेले. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वत:च्या २२ प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गाने घडून आलेले हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना गेला.
वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक दीक्षाभूमीला भेट देत असतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबरला महामानवाला नमन करण्याकरिता लाखो अनुयायी येथे जमतात. त्यात प्रामुख्याने जपान, श्रीलंका,थायलंड येथील अनुयायांचा समावेश असतो. हा बौद्ध धर्मांतर सोहळा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. हा परिसर विस्तारलेला असून कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला येथे बघायला मिळतो. जवळपास ५००० कारागिरांनी अहोरात्र परिश्रमातून निर्माण केलेला येथील भव्य स्तूप जनतेसाठी १८ डिसेंबर २००१ रोजी खुला करण्यात आला. विशेष म्हणजे हा स्तूप आतून पोकळ आहे. अशा प्रकारचा हा जगातील सगळ्यात मोठ्या स्तुपांपैकी एक मानला जातो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर येथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे.
स्तुपाचा परीघ आणि उंची ३७ मीटर आहे. तळमजल्यावर १२२० चौरस मीटरचे सभागृह आहे. त्या सभागृहातील भगवान बुद्धाची मूर्ती नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या थायलंडच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. याठिकाणी बाबासाहेबांचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे. येथील भव्य सभागृहाला प्रशस्त व्हरांडा आहे. त्याला साचीच्या स्तुपारसारखेच चार दिशांना चार आर्चेस आहेत. या चारही द्वारातून भव्य पटांगणात आपण प्रवेश करतो. याच परिसरात बौद्ध विहार आहे. तिथे बोधीवृक्ष लावण्यात आला आहे. हा वृक्ष म्हणजे श्रीलंकेतील अनुराधापुरम् येथील वृक्षाची एक शाखाच आहे. विजयादशमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी येथे आंबेडकरी जनतेची प्रचंड गर्दी असते.
कसे पोहोचाल | How to reach Deekshabhoomi Nagpur
- नागपूर रेल्वे स्टेशन प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तेथून ऑटो आणि कॅब सहज उपलब्ध होतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे ६-७ किमी अंतरावर आहे.
- दीक्षाभूमीजवळून स्थानिक बस, ऑटो आणि टॅक्सी नियमितपणे जातात.
केव्हा जायचे
- धम्मचक्र प्रवर्तन दिन काळात गर्दीमुळे प्रवासाला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे नियोजनासाठी पुरेसा वेळ राखून ठेवा.
- दीक्षाभूमी सामान्यतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुली असते.
विशेष कार्यक्रम किंवा सोहळ्याच्या दिवसांमध्ये प्रवेशाच्या वेळेत थोडा बदल होऊ शकतो. संग्रहालयाप्रमाणे येथे बंद होण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते, पण दिवसा किंवा संध्याकाळच्या सुरुवातीला भेट देणे सहसा अधिक चांगले असते. सकाळ अधिक शांत वाटते. संध्याकाळ चिंतनाला चालना देणारी असते. दीक्षाभूमीवर प्रवेश विनामूल्य आहे. तिकिटाची किंवा ऑनलाईन बुकिंगची आवश्यकता नाही.
तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!