नागार्जुन गुफा बौद्ध सर्कीट | Nagarjuna Caves Buddha Circuit | Vidarbha Buddha Circuit
सातवाहन वाकाटक काळात नागार्जुन हे महान बौद्ध तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि महापंडित होते. ते महायान पंथाचे संस्थापक होते. त्यांनी रामटेक - मनसर जवळील एका टेकडीवर वास्तव्य केले. या नागार्जुन टेकडी परिसरात गुफा व अनेक प्राचिन अवशेष आढळून आले आहेत. हा संपूर्ण परिसर आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी होता.
Historical Significance of Nagarjuna
नागार्जुन टेकडीसमोर एक मोठा बौद्ध विहार आहे. या विहारात गौतम बुद्धांसोबतच नागार्जुनांचीही मूर्ती आहे. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील बौद्ध धर्माचे अभ्यासक या ठिकाणी अवश्य भेट देतात. इतिहासकारांच्या सांगण्यानुसार हर्षवर्धन राजाच्या काळात चीनचे बौद्ध प्रवासी ह्युएनत्संग यांनी रामटेकच्या आचार्य नागार्जुन यांचा आवर्जुन उल्लेख केला होता.
चीन, तिबेट आणि मंगोलियाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात नागार्जुन यांच्या कार्याला अमूल्य स्थान आहे. शून्यवादाचा सिद्धांत त्यांनीच मांडला होता. जपानमधील एका अध्ययन संस्थेत केवळ नागार्जुन यांच्या ग्रंथ संपदेवर संशोधन केल्या जाते.
The Palace Complex of the Vakataka Dynasty
विदर्भाचे कुलभुषण असलेल्या नागार्जुनांचा जन्म ब्राह्मण कुळातील आहे. त्यांनी युवावस्थेतच वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. नंतर ते बौद्ध भिक्षु झाले. या मतास विदर्भात प्रचलित असलेल्या एका दंतकथेचा पुरावा मिळतो. त्यानुसार एका ज्योतिषाने नागार्जुनाला बालपणी सातव्या वर्षी मृत्यू येईल असे भविष्य वर्तविले होते. ही दु:खद घटना आपल्या समोर घडू नये म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सेवकाच्या स्वाधीन करीत रामटेकला पाठविले. तेथे ते बौद्ध भिक्षुंच्या सहवासाने एका गुफेत राहू लागले. तिला आजही नागार्जुन गुफा असे म्हणतात. अशा परिस्थितीत असताना एके दिवशी महाबोधीसत्व अवलोकितेश्वराने त्यांना नालंदा येथील विहारात जाण्यास सांगितले व त्यांचा अपमृत्यू टळला. पुढे ते महान आचार्य झाले.
Nagarjuna Tekdi at Mansar
मनसर येथील टेकडीवरच त्यांनी धम्म साधना केली. हिमालयातून आणलेल्या औषधी वनस्पती त्यांनी येथे लावल्या होत्या. त्यांच्या रसशाळेत बनणाऱ्या औषधांनी रोगांवर उपचार होत असे. त्याकाळी रामटेकमधील अंबाळा तलाव हा कृष्ठरोगासह इतर रोगांचे मुक्तीस्थळ मानला जात होता. नागार्जुन टेकडीवरील वनस्पतींमधील औषधीरस अंबाळा तलावाच्या पाण्यात मिसळत असे. त्यामुळे ते पाणी औषधाच्या रुपात वापरले जात असे. उपचारासाठी दूरदूरुन येथे लोक येत असत. तलावाच्या काठावर झोपड्या बांधूत रहात. नागार्जुन टेकडीवर आध्यात्मिक साधना होत होती. शिवाय येथे आयुर्वेदाचार्यही तयार होत असत.
चिकित्सक आणि धम्म प्रचारक या नात्याने नागार्जुन लोकांना तन-मनाने सुदृढ राहण्याची शिकवण देत असत.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!