बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
वऱ्हाडात (पश्चिम विदर्भ) अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा डोंगरी किल्ला हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात असे. ज्याचे हाती बाळापूर त्याचे हाती वऱ्हाड असे जणू समिकरणच होते. दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला पडतो. दक्षिण विदर्भात माहुरगडला जसे महत्व आहे तसे वऱ्हाडात बाळापूरला. शिवछत्रपतींच्या काळात बाळापुरातूनच वऱ्हाडाच्या मोहिमा आखल्या जात. बाळापूरजवळचे अकोला हे गाव औरंगजेबाच्या काळात इ.स. १६९० साली आसदखान नावाच्या सरदाराने वसविले. त्यानेच येथे आसदगड या नावाने येथे एक छोटेखानी भुईकोट बांधला.
बाळापूर बसस्थानका पासून किल्ला कार्यालय २ किमी अंतरावर असल्याने दुरुनच तटबंदी व बुरुजाचे दर्शन होते. प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील मेहरपीचे स्थापत्यशिल्प अप्रतिम आहे.
बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे.
या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.
तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते.
बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
याच गावात महिषा व मनकर्णिका या दोन नद्यांच्या संगमावर त्रिपुरसुंदरी-बालसुंदरीचे देवालय आहे. समर्थ रामदास स्वामी १६३३ साली या मंदिरात आले असावे असे तर्क आहे. त्यावेळी वऱ्हाडात इतमादशाहीची सत्ता होती. समर्थांनी याच देवळात शिष्य-महंतांची भेट घेतली असे सांगतात.
बाळापूरच्या किल्ल्यात १७२० साली मराठा-निझाम-मोघल यांचे तुंबळ युद्ध झाले होते. त्या लढाईस बाळापूरची लढाई म्हणतात. याच किल्ल्यात श्रीमंत माधवराव पेशवे आणि राघोबादादा डिसेंबर १६६५ मध्ये नागपूरकर भोसलेंवर चालून आले तेव्हा पेशवे व निझाम यांचे सैन्य भोसलेंच्या मागावर होते. बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे.
कसे पोहोचाल | How to go to Balapur Fort
बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.अकोल्यापासून सुमारे २६ किमी अंतरावर आहे.
हा किल्ला शेगाव रेल्वे स्टेशनपासून केवळ १९ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही शहरातील कोणत्याही भागापासून शेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत येऊ शकता किंवा मग बस स्टॉप सुद्धा आहेत. बसने यायचे असल्यास शेगाव बस तुम्हाला कोणत्याही मुख्य शहरापासून मिळू शकते. तेथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक बस पकडून सुद्धा बाळापूरला जाऊ शकता.

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!