गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वत रांगात चिखलदऱ्याच्या पठारावर दक्षिण दिशेस सुमारे ६ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून २९४० फूट उंचावर गाविलगड उभा आहे. मेळघाटच्या घनदाट अरण्यात वसलेला गाविलगड जणू दक्षिण दिशेचा पहारेकरीच आहे. हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.
गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणाऱ्या मार्गावर बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे.
किल्ल्याची रचना वर्तुळाकार आहे. ६ मैल परिसरात तो पसरला आहे. अनेक भग्न इमारती,तलाव,मंदिर, राणीमहाल, समाध्या, वृंदावन, मशिदी व इतर लहानसहान वास्तु या किल्ल्यावर आहेत. तिन्ही बाजूला उंच आणि अभेद्य कडे असले तरी किल्ल्याचा वरचा घेर संपूर्ण चिरेबंदी दगडांचा आहे.
गाविलगड | Gavilgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
१८५७ च्या तात्या टोपेंच्या बंडाला आश्रय मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी गाविलगडावरील दरबारगृह, सभागृह, सिंहासन व इतर अनेक इमारती अक्षरश: तोफेच्या गोळ्यांनी फोडून टाकल्या. तरीही या बलाढ्य गाविलगडाने त्यांना दाद दिली नाही. मुख्य इमारतीला मोठी तळघरे आहेत. भोसल्यांचा खजिना तेथे असायचा. १८०३ साली द्वितीय आंग्ल मराठा युद्धात हा किल्ला ताब्यात घेताना इंग्रजांना भरपूर कषट उपासावे लागले.
गाविलगडाजवळच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. देवी लेणे हे शैलगृह, मेळघाट व्याघ्र प्रकल्प या सर्व पर्यटन स्थळांचे सानिध्य व ७०० वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार गाविलगड विदर्भाचा मानदंडच आहे.
कसे पोहोचाल | How to go to Gavilgad Fort in Marathi
रस्त्याने प्रवास करायचा असल्यास, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून अमरावतीपर्यंत नियमित एसटी बस आणि खासगी टॅक्सी उपलब्ध आहेत. अमरावतीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेले चिखलदरा दाट जंगलं आणि डोंगरमाथ्यांच्या रम्य वाटेने सहज गाठता येते.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात जवळचे स्थानक अमरावती आहे. तिथून बस किंवा टॅक्सीने चिखलदऱ्याचा प्रवास करता येतो. हवाई मार्गाने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. नागपूरपासून चिखलदरा सुमारे २३० किमी अंतरावर आहे. तिथून प्रवाशांना खासगी टॅक्सी, भाड्याने कार किंवा बसचा पर्याय उपलब्ध असतो.
केव्हा जायचे | When to go to Gavilgad Fort in Marathi
गाविलगड किल्ला रविवारी सकाळी ९ ते ६ वाजपर्यंत आणि आठवड्याच्या इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
गाविलगड किल्ला भटकंतीसाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्चदरम्यान असतो. या काळात हवामान आल्हाददायक आणि थंडसर राहते, त्यामुळे किल्ल्याचा इतिहास शोधणे आणि त्याचा देखणा नजारा अनुभवणे अधिक आनंददायक होते. हिवाळ्यात येथील थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि स्वच्छ आकाश किल्ल्याच्या भव्य वास्तुकलेचा आस्वाद घेण्यास परिपूर्ण वातावरण निर्माण करतात. पावसाळ्यात गाविलगड परिसर जणू निसर्गाच्या हिरव्या गालीच्याने नटलेला असतो. धुके आणि लहानसहान धबधबे या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र, या काळात चिखल आणि ओलसर रस्त्यांमुळे किल्ल्यावर चढणे थोडे कठीण होऊ शकते. उन्हाळ्यात मात्र इथली उष्णता आणि रखरखाटामुळे भटकंती त्रासदायक वाटू शकते. इतिहासप्रेमी, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी गाविलगड किल्ला एक अद्वितीय ठिकाण आहे.

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!