उंबरठा (उमरेडचा किल्ला) | Umred Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
नागपूर जिल्ह्याचा उंबरठा म्हणजेच उमरेडचा किल्ला हा स्थल दुर्ग कक्षेत मोडणारा बलदंड तटबंदी-बुरुज आणि जलव्यवस्थेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. तत्कालीन राजकारणात किल्ल्याचे स्थान फार महत्त्वाचे नसले तरी नाकेबंदी व राखीव सैन्य, अश्व, हत्ती तसेच पायदळ ठेवण्यासाठी उमरेड किल्ला प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे या गावातील रेशमी काठाचे धोतर विणणारे विणकर अख्ख्या महाराष्ट्रात नावाजले होते. नागपूर जिल्हा हा तसा पठारी आहे. उमरेड हे शहराच्या दक्षिणेला वसलेले तालुक्याचे ठिकाण आहे.
🏯 किल्ल्याची रचना व तटबंदी | Umred Fort History & Architecture in Marathi
या गावात प्रवेश करताच तुम्हाला दगडी तटबंदीने बांधलेली वेस दिसते. त्याच्या आतील भाग म्हणजेच हा उमरेडचा किल्ला. याची तटबंदी लालसर-पिवळसर रवाळ प्रस्तराने बांधलेली असून येथे सात टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य आणि काष्ठ शिल्पाचा उत्कृष्ट नमुना होते. जरीपटका हत्तीवरील अंबारीसकट आत प्रवेश करता येईल एवढे ते उंच होते. त्यामानाने किल्ल्याचे म्हणजेच राजवाड्याचे क्षेत्रफळ तसे कमीच असून आता फक्त बगिचा तेवढाच शिल्लक आहे.
झाडीमंडळ हे पूर्व विदर्भाचे मध्ययुगीन नाव. त्या क्षेत्राचा उंबरठा म्हणजे उमरेड किल्ला अशी व्युत्पत्ती स्थानिक नागरिक सांगतात. हा किल्ला मुळात इ.स. १७ व्या शतकातील गोंडकालीन असावा. पुढील काळात पराक्रमी रघुजी भोसलेंचे त्यावर अधिपत्य होते. येथील बगिच्यातील पुष्करणी नक्कीच प्राचीन असावी. गोंड राजे कलेचे उपासक होते. बागबगिचे, तलाव, पुष्करण्या यांची त्यांना भारी हौस होती. हा किल्ला म्हणजे राजे बख्त बुलंद शाह यांच्या कारकिर्दीतील संरक्षण वास्तू. सरदार देवाजी पाटील (कन्हेरे) यांचे वास्तव्य येथे होते. इतिहासातील नोंदीनुसार नाना फडणीस, श्रीमंत रघुजी (प्रथम), रघुजी द्वितीय आणि देवाजीपंत चोरघडे येथे येऊन गेले. उमरेडात किंबहुना झाडीमंडळातच गिरी-गोसावी मंडळींचे वर्चस्व होते. येथील मुरलीधर मंदिर त्याच्या स्थापत्य कलेवरून भोसलेकालीन वाटते. उमरेड किल्ला बघायला गेलात की उमरेड–कऱ्हांडला अभयारण्याची सफारी करायला मात्र विसरू नका. येथे वाघांचे वास्तव्य आहे. त्यांची भेट नक्की घ्या.
🗺️ कसे पोहोचाल | How to Reach Umred Fort from Nagpur
उमरेड गाव नागपूरपासून ४७ किमी अंतरावर असून तालुक्याचे ठिकाण असल्याने परिवहनाची चांगली व्यवस्था आहे. शहर बसने जाता येईल किंवा खासगी टॅक्सीही करता येईल. नागपूर–नागभीड महामार्गावर असल्याने प्रवास सुखकर आहे.
कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !
Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!