जपानी लोकांच्याही दारात ‘भुतांची घरं’ | Travel Experience in Japan in Marathi Part 3
आठवणीतील जपान भाग तीन | Travel Experience in Japan in Marathi Part 3
टोकियोतील गगनचुंबी इमारती,तेथील झगमगाट आणि लोकांचं राहणीमान बघून जपानी लोकांवरही पाश्चिमात्य संस्कृतीची छाप पडली असा माझा समज झाला होता. परंतु पुढे जसजसा लोकांशी परिचय होत गेला तसतसा हा गैरसमजही दूर होत गेला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर पादक्रांत करणाऱ्या या देशानं आपली संस्कृती आणि संस्कार तळहातावरील फोडाप्रमाणं जपले आहेत. त्याला आधुनिकतेचा स्पर्शही होऊ दिलेला नाही. जपानच्या विविध शहरांमधील अप्रतिम प्राचीन बौद्ध मंदिरं हे त्याचे प्रतीक आहेत. एकही पडीक मंदिर येथे दिसणार नाही. सर्वच मंदिरांची फार काळजी घेतली जाते. जपानची ही बौद्ध मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. जपानी लोकांचं एक नवीन रुप मला या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बघायला मिळालं. कुशाग्र बुद्धी, मेहनती, प्रामाणिकपणा या गुणवैशिष्ट्यांसोबतच हे लोक अतिशय श्रद्धाळु आहेत याचा अनुभव आला. टोकियोत पोहोचल्यानंतर तिसऱ्याच दिवशी येथील युवकयुवतींसोबत हे शहर फिरण्याची संधी मिळाली. हा संपूर्ण दिवस खरोखरच खूप मजेत गेला. मराया आणि जीम हे दोघं आमच्यासोबत होते. एरवी जपानमध्ये इंग्रजी फारसं चालत नाही. पण हे दोेघंही आमच्यासारखंच तुटकतुटक इंग्रजी बोलत होते. त्यामुळं भाषेचा प्रश्न आला नाही. शिवाय माझाही इंग्रजी बोलण्याचा विश्वास वाढला. मरायानं सुरुवातीलाच आम्हाला विचारलं, येथील आसाकुसा बौद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. तुम्हाला बघायची इच्छा आहे काय? आम्ही सर्वांनीच याला होकार दिला. या आसाकुसा मंदिरात जाण्याकरिता भुयारी मार्गानं जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसायला मिळालं. जमीन कमी असल्यानं अगदी इंचइंच जमिनीचा कुशलतेने वापर करुन घेण्यात आला आहे. येथील रेल्वेस्थानकावर आपल्या येथे असते तशी घाण आणि अस्वच्छता नव्हती. अथवा लोकं झोपलेले नव्हते. त्यामुळे गाडीत चढण्यासाठी अडथळ्यांची शर्यत करण्याची गरज पडली नाही. गाडीत शिरल्यानंतर तेथील स्वच्छता आणि जपानी हसरे चेहरे बघून प्रसन्नता वाटली. या देशातील एक महिन्याच्या वास्तव्यात एकाही जपानी माणसाच्या कपाळावर मी आठी आलेली बघितली नाही. सतत कष्ट करणाऱ्या या लोकांचे चेहरे एवढे हसरे कसे राहू शकतात,याचच आश्चर्य वाटत होतं.
आसाकुसा बौद्ध मंदिराचा संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून निघाला होता. याठिकाणी दररोज लोकांची अशीच गर्दी असते असं कळलं. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या जलकुंडात हात आणि तोंड धुवून नंतर मंदिराच्या आत दर्शनासाठी जात होती. मंदिराच्या परिसरात मोठा बाजारही होता. आपल्या येथील मोठ्या देवस्थानांसमोर असतात तसाच. फरक एवढाच या मंदिरांचा परिसर आपल्या मंदिरांप्रमाणे गचाळ नव्हता. कुठेही अस्वच्छता नव्हती. जवळपास दोन तास आम्ही या मंदिरात होतो. त्यानंतरच्या संपूर्ण प्रवासातही ज्या ज्या शहरांना आम्ही भेटी दिल्या तेथील प्राचीन मंदिरं बघितली. प्रामुख्याने आयची प्रिफेक्चरमधील ओकाझाकी शहर.जपानमधील हे ऐतिहासिक शहर तेथील हिरवळ आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
ओकाझाकीला जाण्यासाठी प्रथम मिकावा एनजोलापर्यत बुलेट ट्रेननं जायचं होतं. या देशात रेल्वेगाड्यांच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. गाडीला 15 मिनिट जरी विलंब झाला तरी प्रवाशांना तिकिटाचे अर्धे पैसे परत केले जातात असं समजलं. एकदा वेळ झाली की अगदी देशाच्या पंतप्रधानासाठी सुद्धा ही गाडी थांबत नाही. साध्या गाड्याच स्थानकावर काही सेकंद थांबून अशा वेगाने पळतात, मग ही तर बुलेट ट्रेनच होती. ताशी २५० किमीच्या वेगानं धावणारी. बुलेट ट्रेनचं फक्त नाव ऐकलं होतं. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर एखाद्या विमानाप्रमाणं बुलेट ट्रेननं लॅण्ड केलं. मनात धडधड सुरु होती. आपण बसायच्या आधीच गाडी सुटली तर? या गाडीत ओढायला साखळी होती की नाही कोण जाणे? प्रत्येकालाच गाडीत चढायची घाई झाली होती. गाडीत चढून सीटवर बसल्यानंतर ‘चढलो एकदाचं’ असं म्हणतच मी श्वास घेतला. आणि अवघ्या काही क्षणात एखाद्या बंदुकीतून बुलेट बाहेर पडते अशा सुसाट वेगाने ही बुलेट ट्रेन निघाली. आपण जमिनीवर आहोत की हवेत हेच कळत नव्हतं. या गाडीत टीव्हीपासून सर्व व्यवस्था होती. जपानी लोकांना पुन्हा एकदा सेल्युट ठोकण्याची इच्छा झाली. हा देश राखेतून उभा झाला आहे असं कुठेही वाटत नव्हतं. देशप्रेम,जिद्द आणि महत्वाकांक्षेनं त्यांना विध्वंसातून यशोशिखरावर आणलं,हेच खरं!
सुमारे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही मिकावा एनजोलाला पोहोचलो. तेथून ओकाझाकीपर्यतचा प्रवास बसनं केला. ओकाझाकी ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या हॉटेलच्या अगदी बाजूला कॅसल आणि समोर छोटासा तलाव होता. निसर्गानं या शहराला अगदी भरभरुन दिलयं. त्या सायंकाळी तलावाच्या काठावर गाण्याची सुरेख मैफल रंगली होती. जपानी आणि हिंदी गाण्यांचा तो आगळावेगळा मिलाप होता. एकमेकांची भाषा समजत नसली तरी मनात मैत्रीचा धागा होता. जपानी मित्रमैत्रिणींसोबत आम्ही त्यांची गाणी म्हटली आणि त्यांनी आमची.
दोन दिवस आमचा येथेच मुक्काम राहणार होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्याच बाजूला असलेला राजवाडा बघून आलो. जपानमध्ये ठिकठिकाणी असे राजवाडे आहेत. येथेही काही महत्वाच्या मंदिरात जाऊन आलो. लाकडाचा वापर करुन एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात आलेली ही मंदिरं म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुना होता. त्यांच्या सभोवतालचा परिसरही तेवढाच आल्हाददायक.
Buddhist Temple - Travel Experience in Japan
सहाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे सुमारे १४०० वर्षांपूर्वी मोनोबे शिंपुकुनं बांधलेलं बौद्ध मंदिर म्हणजे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान. त्या काळात जपानवर चीन आणि कोरियन संस्कृतीचा आत्यंतिक प्रभाव होता. ५३८ दरम्यान जपानमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यात आला. याच धर्माच्या आधारे देशात चांगल्या पद्धतीनं शासन करता येईल,असा लोकांचा विश्वास होता. परंतु काही परंपरागत विरोधकांनी मूर्तीपूजेची प्रथा सोडली नव्हती. मोनोबे क्लान हा त्यापैकीच एक. त्याच्या पित्याने एक अक्षम्य गुन्हा केल्यानंतर मोनोबे शिंपुकु हा भूमिगत झाला आणि त्याचवेळी त्याने बौद्ध धर्म स्वीकारला अशी दंतकथा आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यानं धर्म प्रचारासाठी स्वत:ला वाहून घेतलं. मिकावा प्रांतात असताना एक दिवस त्याला एका पाण्याच्या तळ्यात देदीप्यमान अशा न्योरोईचं (तथागत) दर्शन झालं. त्याच ठिकाणी नंतर शिंपुकुनं बौद्ध मंदिर बांधलं. जे आज शिंपुकुजी मंदिर या नावानं ओळखलं जातं. अनेक वर्षांपासून या मंदिराची अत्यंत काळजीपूर्वक देखरेख केली जाते आहे. जपानमध्ये हजारो सम्राट झाले. परंतु त्यांनीही या मंदिराचं पावित्र्य कायम राखण्यात कोणतीही कसूर केली नाही. या मंदिराचा प्राचीन इतिहास लक्षात घेता जपान सरकारही महत्वाची राष्ट्रीय सांस्कृतिक संपत्ती म्हणून त्याची काळजी घेत आहे.
या मंदिरात असलेल्या कारंजाबद्दल जपानींच्या मनात आगळी श्रद्धा आहे. या कारंजाचं पाणी विविध रोगांना बरं करतं असा समज आहे. दर महिन्याच्या सात तारखेला हजारो लोक विशेषत: डोळ्यांचा विकार असलेले मंदिरात येऊन या कारंजाचे पाणी तीर्थासारखं पितात,या पाण्यानं डोळे धुतात. या मंदिरांमध्ये भविष्याच्या चिठ्ठ्या मिळतात. या चिठ्ठीतील भविष्य वाचल्यावर त्या झाडाच्या फांदीला बांधायच्या असतात. यातील भविष्य जपानी भाषेत लिहिलेलं असल्यानं विदेशी पर्यटकांना काही कळत नाही. मी पण एक चिठ्ठी घेतली. मरायाला त्यात काय लिहिलयं ते विचारलं. आणि नंतर ती चिठ्ठी झाडाला बांधली. आपल्याकडे पण आदिवासी ग्रामीण भागात झाडांना विशेषत: गावाच्या वेशीवर कापडाच्या चिंध्या बांधलेल्या मी बघितल्या आहेत. आपल्याप्रमाणेच हे लोकही देवांना नैवेद्य दाखवितात. या मंदिरातील जिकेईदेशीचा पुतळा आणि बुद्धाची तीन मस्तके अतिप्राचीन आहेत. धार्मिकतेच्या बाबतीत भारतीय आणि जपानी लोकांमध्ये खरोखरच खूप साम्य आहे. आपल्या येथे विविध देव आणि धार्मिक स्थळांच्या जशा हजारो दंतकथा ऐकायला मिळतात;तशाच तेथेही आहेत. दायजुजी मंदिराबद्दलही अशीच एक दंतकथा आहे.
इयासू तोकुगावा ही सुद्धा जपानच्या इतिहासातील एक महत्वाची व्यक्ती समजल्या जाते. ५०० वर्षांपूर्वी जपानमध्ये फार मोठ्या प्रमाणात यादवी सुरु होती. देश छोट्याछोट्या भागात विभागला गेला होता. प्रत्येक राजा आपलं वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात होता. इयासू सुद्धा त्यापैकीच एक. अनेक युद्ध केल्यानंतर वयाच्या ६२ व्या वर्षी तो शोगून (जनरल) झाला. त्याच्या काळात जपानमधील यादवी बंद होऊन जनतेला शांतीपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळाली. त्यामुळं इयासूला येथील लोक खूप मानतात. हा काळ ‘इडो पिरियड’ म्हणून ओळखल्या जातो. हाच इयासू 3 वर्षाचा असताना या दायजुजी मंदिरात आश्रयाला आला होता. आपल्या येथे मथुरेत श्रीकृष्ण देवस्थानासोबत मशीदही आहे. मंदिर-मशीद एकाच ठिकाणी असलेली आणखीही धार्मिक स्थळे आहेत. तसच ओकाझाकीमधील इगा हचीमंगु श्राईन म्हणजे जपानमधील दोन धर्मांचा संगम आहे. येथे शिंटो आणि बौद्ध या दोन्ही धर्मांची मंदिरं आहेत. १५ व्या शतकात ज्यावेळी या देशात यादवी सुरु होती तेव्हा मातसुडायरा चिकाटारानं या मंदिराची निर्मिती केली. या लाकडी मंदिराची कलाकुसर अतिशय देखणी आहे.
क्योटो शहरातील किंकाकुजी हे मंदिर बघितल्यानंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची आठवण झाली. हे मंदिर पाण्यात आहे. सभोवताल हिरवेकंच डोंगरमाथे आणि एका छोट्याशा तलावात मधोमध असलेलं हे मंदिर बघितल्यानंतर या परिसराचा मोह आवरेनासा झाला. एका वेगळ्याच शांतीची अनुभूती येथं आली. एरवी सतत कामाच्या व्यापात असलेले जपानी लोक हे मंदिर न्याहाळताना ध्यानस्त झालेले मी बघितले. निसर्गाचं हे अप्रतिम सौंदर्य जास्तीतजास्त डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न मी केला. क्योटो शहराच्या उत्तरेकडील भागात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. क्योटोच्या ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेत या मंदिराचं स्थान सर्वोच्च आहे. मंदिराचं मूळ नाव रोकुओंजी असं असलं तरी बहुतांश लोक या मंदिराला ‘किकाकुजी’ किंवा ‘टेंपल ऑफ दी गोल्डन पॅव्हिलियन असं म्हणतात. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हे मंदिर बघतो. त्याशिवाय जपानचा दौराच पूर्ण होत नाही,असे म्हणतात. मंदिराचा परिसर डोळे दिपवून टाकणारा आहे. सोन्याने मढवलेले हे मंदिर सूर्यप्रकाशात आणि रात्रीही अद्भूततेने चमकत असतं. १३९४ मध्ये आशीकागा योशीमिस्तु (मुरोमाची शोगुनातेचा तिसरा-सम्राट) यानं हे मंदिर बांधलं. त्याच्या मृत्यूनंतर मात्र हे मंदिर रोकुओंजी बौद्ध मंदिराच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. हे मंदिर म्हणजे एक तीन मजली पुरातन जपानी इमारत असून मंदिराचा एक अप्रतिम नमुना आहे. या मंदिराच्या सभोवतालचा बगिचा हा कामकुरा काळातील सर्वात ख्यातनाम बगिचा म्हणून ओळखल्या जात असल्याचं कळलं. अनेक शतकं लोटली.या काळात अनेक लढाया झाल्या. परंतु हे मंदिर मात्र सुस्थितीत आहे,हे विशेष! या देशात कोणत्याही युद्धकर्त्यानं धार्मिक स्थळांना हात लावला नाही, याचं कौतुक वाटलं. येथील शासनानेही ज्या पद्धतीनं या ऐतिहासिक खजिन्याची देखभाल केली आहे ते बघून आश्चर्य वाटलं. जपानी लोकांच्या भावनाप्रधानतेची खात्रीच ही मंदिरं बघितल्यानंतर पटली.
जपानमधील बहुतांश मंदिरं ही शोगूनाईतीलच आहेत. निक्कोतील जगप्रसिद्ध रिन्नोजी देवस्थान त्यापैकीच एक. निक्को बघितल्या शिवाय केक्को म्हणू नये अशी एक जपानी म्हण आहे. जपानी भाषेत केक्को म्हणजे सुंदर. डोंगर-टेकड्या, झुळझुळ वाहणारी चिमुकली नदी आणि त्या नदीवरील लाकडीपुल सुद्धा नक्षीदार आणि सुबक होता. या नदीचे नाव होते दय्या आणि पुलाचे मिहाशी. याठिकाणी एक भव्य उद्यान आहे. या उद्यानात १७ हजार वृक्ष असल्याचं सांगण्यात आलं. ही हिरवीकंच वृक्षरांजी केवळ बघत राहावी अशीच होती. याच उद्यानात वृक्षांनी वेढलेल्या एका टेकडीवर रिन्नोजी मंदिर आहे. या परिसरात आणखीही अनेक मंदिरं आहेत. टोगांशू मंदिर बघितल्यानंतरच निक्कोची यात्रा पूर्ण होते. अय्यासू नावाच्या शौर्यवान शोगूनानं टोकुगोवा घराण्याची स्थापना केली आणि अय्यासूच्या मुलानं १७ व्या शतकात हे देऊळ बांधलं असा इतिहास आहे. या मंदिरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तीन लाकडी माकडं. ही माकडं जगभर प्रसिद्ध आहेत. वाईट बघू नका, बोलु नका,ऐकू नका असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडं मुळात निक्कोचीच असावीत. आपण जसे भूतखेत मानतो तसे हे लोक सुद्धा मानतात. गडचिरोलीच्या आदिवासी भागात अनेक घरांमध्ये अंगणात मी भुताचं घर बघितलं होतं. तशीच भुतांची घरं जपानी लोकांच्याही दारात दिसतात. भूत आले की सरळ अंगणातील या त्यांच्या घरातच शिरतात; आपण राहतो तेथे येत नाही आणि त्याची बाधा टळते. देवळात प्राण्यांना महत्वाचे स्थान आहे. या मंदिरांमध्ये अगदी ड्रॅगनपासून मांजरीपर्यत सर्वच प्राणी दिसले. अर्थात लाकडाचे.
बौद्ध हा जपानचा मुख्यधर्म. राष्ट्रीय धर्म शिंटो.देशभरात असंख्य बुद्ध मंदिरं आणि शिंटो मंदिरं आहेत. शिंटो हा जपानमध्येच तयार झालेला धर्म आहे. या धर्मात निसर्गपूजा आणि पूर्वज पूजेला महत्व आहे. आपल्या येथं जसे ३३ कोटी देव आहेत तशीच तिथलीही परिस्थिती आहे. यामध्ये सूर्यदेवाचं पहिले स्थान. त्यापाठोपाठ इतर सर्व. जनावर, झाड,दगड डोंगर सगळे देव आहेत. या देवांना जपानी भाषेत ‘कामी’ म्हणतात.
जपानी राजा हा सूर्यवंशी आहे. त्यामुळं प्रत्येक शिंटो मंदिरापुढं एक सुंदर कोरीव कमान असते. तिला ‘तोरी ’ म्हणतात. या तोरीची पण एक दंतकथा आहे. जपानी उषादेवी एकदा आपल्या भावावर रागवून गुहेत जाऊन बसली होती. उषाच रागवल्यानं संपूर्ण भूमितलावर अंधार पसरला. देवदेवतांनी तिचं मन वळविण्याचा भरपूर प्रयत्न केले,पण व्यर्थ. शेवटी एका देवाला युक्ती सुचली. त्यानं गुहेच्या दाराशी कोंबडा आणून ठेवला. कोंबडा आरवला आणि उषा बाहेर आली. सर्वत्र प्रकाश झाला. हा कोंबडा म्हणजे ही तोरी. मंदिरात आपल्या येथे असतो तसाच गाभारा होता. देवापुढे उभं राहून टाळ्या वाजविणं, डोकं टेकवून नमस्कार करणं हे सर्व या मंदिरात बघायला मिळालं. शिंटो देवांच्या अशा अनेक कथा आहेत. देऊळ शिंटोंचे असो वा बुद्धाचे तेथे सर्वांना प्रवेश असतो.
सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
What’s Up मराठी
संपर्क
कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !
Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!