अनंत ज्यांची इच्छाशक्ती ! गतवैभवासह डौलात उभं आहे हिरोशिमा | Travel Experience in Japan in Marathi Part 7
आठवणीतील जपान भाग सात (अंतिम) | Travel Experience in Japan in Marathi Part 7
जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली तेव्हापासूनच माझ्या मनाला एक हुरहुर लागली होती. कारण जपान म्हटलं की हिरोशिमा आणि नागासाकी आपसुकच आठवतात. आपल्याला ही दोन शहरं बघायला मिळतील काय? याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आणि प्रत्यक्षात हिरोशिमाचा प्रवास सुरु झाला तेव्हा तर अंगावर रोमांच उभे झाले होते. नगोयावरुन आम्ही निघालो त्या क्षणापासून अगदी तेथे पोहोचेपर्यत मनात विचारांचं काहुर माजलं होतं. जगातील साऱ्या मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब ज्या शहरावर टाकला ते हिरोशिमा शहर आता कुठल्या परिस्थितीत असेल, तेथील लोक या धक्क्यातून सावरले असतील काय? असे प्रश्न मनात डोकावत होते. आणि साक्षात हिरोशिमा शहरात पाऊल ठेवल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अणुबाम्बनं उद्ध्वस्त झालेलं हेच ते हिरोशिमा यावर क्षणभर विश्वासच बसेना. अतिशय वेगानं पुन्हा डौलात उभं झालेलं हे शहर बघितल्यानंतर आम्ही जपानी लोकांच्या जिद्दीला सलाम ठोकला.
हिरोशिमाचा इतिहास | Hiroshima History in Marathi
इतिहासाची पानं चाळली तेव्हा एकएका गोष्टीचा उलगडा होत गेला. १५ व्या शतकाच्या मध्यापासून हिरोशिमाचा इतिहास प्रारंभ होतो. १६ व्या शतकाच्या अखेरीस मोरीक्लॅम चुगोकु जिल्ह्यावर प्रभाव असणाऱ्या हिरोशिमाला राजधानी म्हणून विकसित केलं. तेव्हापासूनच संपूर्ण चुगोकु जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून हिरोशिमा ओळखू जाऊ लागलं. अतिशय सुंदर अशा विलो वृक्षांनी वेढलेलं एक स्थळ अशी हिरोशिमाची जपानभर ख्याती होती. अनेक शतकांपासून या शहराचं नाव जगाला ऐकून माहिती होतं मात्र पहिल्या अणुबॉम्बचं लक्ष्य ठरल्यानंतर ते जगासमोर आलं. मेडजी युगात हिरोशिमा व्यापार आणि शिक्षणाचं मोठं केंद्र मानलं जायचं. कालांतरानं या शहरातील सैनिकी साधनेही वाढू लागली. हिरोशिमा सैनिक शिक्षण क्षेत्रात नावारुपास येऊ लागलं. परंतु अचानक अणुबॉम्बच्या रुपात काळानं या शहरावर झडप घातली.
ती काळीकुट्ट सकाळ
Hiroshima Atomic Bomb Attack
६ ऑगस्ट १९४५ ची ती सकाळ हिरोशिमावासीयांकरिता अंधकारच घेऊन आली. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही पहाटेपासून सर्व व्यवहार सुरू झाले होते. लोक आपआपल्या कामाला लागले होते. रविवारचा दिवस म्हणजे शाळांमधील मुलांचा समाजसेवेचा दिवस होता. त्यामुळं शाळकरी मुलांची रस्त्यांवर वर्दळ होती. सर्वच जण मोठ्या उत्साहानं कामाला लागले होते. त्याचवेळी काळ त्यांच्या डोक्यावरुन घिरट्या घालत होता. एका क्षणात सर्वत्र हाहाकार माजला. कोणाला काही कळण्यापूर्वीच आगीचे लोळचे लोळ पसरले. इमारती जमीनदोस्त झाल्या. हजारावर लोक क्षणात मृत्युमुखी पडले. साºया मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला होता. ‘लिटील बॉय’ नावाच्या या बॉम्बची नरसंहारक क्षमता टीएनटीच्या जवळपास १५ हजार टन एवढी होती. या भीषण स्फोटात ९९ टक्के शहर उध्वस्त झालं होतं. लहान मुलं आगीत होरपळली होती. मात्र या जबर धक्क्यानंतरही युद्धोत्तर काळात हे शहर एक आधुनिक आणि प्रगतशील शहर म्हणून ओळखलं जात आहे. येथील शांती स्मृती पार्कमधील पांढरी कबुतरे आकाशात उडत असल्याचं आणि चिमुकली बालकं निरागसपणे हसतखेळत असल्याचं दृष्य बघितल्यानंतर कोणे एकेकाळी या शहरावर बॉम्ब टाकण्यात आला होता यावर विश्वासच बसत नव्हता. पाण्यावर वसलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया या शहरात नद्या आणि पुलांची भरमार आहे. आवश्यक औद्योगिक कारखान्यांशिवाय येथे स्वयंचलित वाहने, पोलाद, जहाज बांधणी, फर्निचरशिवाय इतरही अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हिरोशिमात पोहोचल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी येथील शांती उद्यानात गेलो. ओटा नदीच्या किनारी उभारलेल्या या उद्यानात सर्वत्र हिरवळच हिरवळ आहे. याच ओटा नदीच्या दोन शाखांवरचा पुल ‘एनोला गे’ चं मुख्य लक्ष होता,असं सांगण्यात आलं. ज्या विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकण्यात आला त्या विमानाचं नाव ‘एनोला गे’ होतं. स्मारकात लहान मुलांसोबतच तरुण आणि वृद्ध लोकांचेही येणे जाणे सुरु होते. आजही विश्वशांतीची प्रार्थना करण्याकरिता दररोज असंख्य लोक येथे येत असतात. बॉम्बस्फोटात अपंगत्व आलेले एकदोन जण व्हिलचेअरवर येथे आलेले दिसले.
ऑटोमिक बॉम्ब डोम
Atomic Bomb Dome, Hiroshima
या पार्कच्या अगदी बाजूला असलेल्या हिरोशिमा इंडस्ट्रीयल प्रोमोशन हॉलचे अवशेष हिरोशिमातील बॉम्बस्फोटांची जणू साक्षच देत होते. एकेकाळी याच इमारतीत चांगली चहेलपहेल राहात होती. बॉम्ब स्फोटानंतर शिल्लक राहिलेल्या या इमारतीचे अवशेष काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. या इमारतीवरील घुमटाच्या छत्रीसारख्या आकारामुळे येथील जनतेने त्याला ‘ऑटोमिक बॉम्ब डोम’ असं नाव दिलं. बॉम्बस्फोटानंतर झालेली जखम भरुन काढताना लोकांना या जखमेचा संपूर्ण विसर पडू नये म्हणून कदाचित हे अवशेष कायम ठेवण्यात आले आहेत.
याच उद्यानामध्ये एक शांती ज्योत आहे. ही ज्योत वर्षभर जळत असते. पृथ्वीवरील अण्वस्त्रे जोपर्यत नष्ट होत नाहीत तोपर्यत ही ज्योत अशीच तेवत ठेवण्याचा निर्धार जपानी लोकांनी केला आहे. येथील एका शाळकरी मुलीच्या स्मृतीत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा इतिहास तर मन हेलावून टाकणारा आहे. विस्फोटात ठार झालेल्या या मुलीला रंगीबेरंगी कागदांच्या पट्ट्या जमविण्याचा छंद होता. हजारो पट्ट्या जमविण्याची तिची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलं तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोबत रंगीत कागदाच्या पट्ट्या घेऊन येतात. आणि या ठिकाणी विश्व शांतीची प्रार्थना करतात.या स्मारकाच्या सभोवताल रंगीबेरंगी कागदी पट्ट्यांचे ढीग साचले आहेत. पार्कच्या मध्यभागी भव्य अणुबॉम्ब स्मृती स्मारक बांधण्यात आलं आहे. या स्मारकाचं काम १९५२ मध्ये पूर्ण झालं. या स्मारकामधील उध्वस्त हिरोशिमाची आठवण ताज्या करणाºया वस्तु बघितल्यानंतर मन सुन्न झालं होतं. स्फोटाच्या भीषणतेची जाणीव झाली. घरातील भांडी, लोकांचे फाटलेले कपडे, शाळकरी मुलांचे रक्ताने माखलेले गणवेश बघताना डोळ्यातून केव्हा अश्रु वाहू लागले कळलेच नाही. विशेष म्हणजे या विस्फोटानंतर अमेरिकेनं काढलेली छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती देणारी कॅसेट येथे होती. स्मारकात प्रवेश केल्यानंतर ही कॅसेट आणि टेपरेकॉर्डर आम्हाला देण्यात आला. हे वर्णन ऐकता ऐकता स्मारकातील अवशेष बघताना या भीषण घटनेचं जिवंत चित्रच डोळ्यासमोर उभं ठाकलं होतं. किती विदारक परिस्थिती निर्माण झाली असेल त्यावेळी.
ओटा नदीच्या किनारी
येथील ओटा नदी या विद्ध्वंसाची फार मोठी साक्षीदार आहे. बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण शहर एका विराट वादळाच्या आवर्तनात सापडलं असताना अग्निज्वाळा आणि वादळापासून बचावाकरिता हजारो अगतिक नागरिकांनी स्वत:ला या नदीत झोकून दिलं होतं. परंतु समुद्राला मिळणाºया या नदीत आणि समुद्रातही प्रचंड लाटा निर्माण झाल्यानं या सर्वांचा अंत झाला. ओटा नदीच्या किनारी आमच्या सोबत असलेल्या जपानी मैत्रिणीनं स्फोटानंतरचं विदारक चित्र वर्णन केलं तेव्हा सर्वांचे डोळ पाणावले. ओटा नदीचा प्रवाह मात्र संथपणे वाहात होता.
बॉम्बस्फोटाचा केंद्रबिंदू बघताना..
हे स्मारक बघण्यासाठी आम्हाला फक्त दीड तासांचा वेळ देण्यात आला होता. त्यामुळं सुरुवातीपासूनच आम्ही थोडं नाराज होतो. वेळ केव्हा निघून गेला कळलेच नाही. आमच्या समन्वयकांनी जेवणासाठी जाण्याची घाई सुरु केली होती. पाय निघत नव्हता पण नाईलाज होता. जेवतानाही मन अस्वस्थ होतं. या स्मृती उद्यानात आणखी काही वेळ घालवण्याची इच्छा होती. आमच्या जवळ शहराचा संपूर्ण नकाशा होताच. शिवाय ज्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती ते हॉटेलही या स्मृती उद्यानापासून जवळच होतं. जपानमधील वास्तव्याला बरेच दिवस लोटून गेल्याने हिंमत वाढली होती.आम्ही पाच-सहा जण दुपारी पुन्हा या ऐतिहासिक स्मृती उद्यानात गेलो. तेथील एकएक वस्तु परत निरखून बघितली,अनुभवली. हे सर्व बघत असतानाच बॉम्ब नेमका कुठे पडला, त्याचा केंद्रबिंदू कुठे होता हे बघण्याची उत्सुकता लागली होती. कारण ते स्थळ या स्मृती उद्यानात नव्हतं. जवळ असलेल्या नकाशातून आम्ही ते स्थळ शोधून काढलं. दीड दोन तास भटकल्यानंतर एका गल्लीत एक छोटासा स्तंभ दिसला. त्या स्तंभावर लिहिलेले लिखाण वाचलं. ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी हिरोशिमावर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब नेमका याच ठिकाणी पडला होता. भरवस्तीतील ही जागा स्मारकापासून काही अंतरावर आहे. याच्या बाजूलाच मोठा बाजारही आहे. बॉम्ब स्फोटानंतर येथं भला मोठा खड्डा पडला होता. आता मात्र हा खड्डा बुजविण्यात आला असून याठिकाणी हिरवं गवत उगवलं आहे. जगातील पहिला अणुबॉम्ब ज्या शहरावर पडला ते हिरोशिमा आणि नेमका ज्या ठिकाणी पडला ते ठिकाण बघितल्यानंतर या दौºयाचं खºया अर्थानं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि येथील आजचे वैभव बघून जपानी लोकांचं कौतुकही वाटलं. दुसºया महायुद्धात अमेरिकेनं केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात जपान बेचिराख झाला. मात्र अल्पावधीतच या देशानं आपलं पूर्वीचं वैभव प्राप्त करुन पुन्हा आपला दबदबा सिद्ध केला. तो केवळ जपानी नागरिकांच्या देशभक्तीमुळे.
देशभक्तीने ओतप्रोत जपानी माणूस
जपानी माणूस देशासाठी कोणताही त्याग करण्यास सदैव तत्पर असतो. अणुबॉम्ब स्फोटानंतरही त्याची प्रचिती आली. त्यावेळी येथील दाखविलेल्या धाडसाच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या. आग शहरभर पसरु नये म्हणून हिरोशिमात सत्तर हजारांवर घरे पाडून तीन लांबलचक अग्निरोधक पट्टे तयार करण्यात आले होते. लाखावर लोकांना शहर सोडून बाहेर जावं लागलं.
जपानी सरकारनं देशवासीयांना त्यांच्या घरात असलेलं निरुपयोगी लोखंड (भंगार )सरकार जमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला लगेच प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जण आपल्या घरातील निरुपयोगी लोखंड आणून रस्त्यामधील मोठ्या चौकात टाकू लागला. बघता बघता केवळ चारपाच दिवसात चौकाचौकात भंगाराचे ढिगारे जमा झाले. सरकारने ते सर्व लोखंड जमा करुन कारखान्यात नेलं व त्या भंगारापासून थोड्याच दिवसात रेल्वेची सात इंजिने तयार केली.
जगाला शांतीचा संदेश
या महाभयंकर घटनेच्या स्मृती अजूनही येथील जनतेच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या मनात ही आठवण अजूनही ताजी असली तरी या डोंगराऐवढ्या दु:खाने हे लोक खचले नाहीत किंवा रडतही बसले नाहीत. उलट नव्या जोमाने, नव्या जिद्दीने परत कामाला लागले. आणि एका नवीन हिरोशिमाची निर्मिती केली. युद्धाला युद्धानेच उत्तर अशी बदल्याची भावना मनात न बाळगता जगाला शांतीचा संदेश देण्याचे कार्य येथील जनता करीत आहे.
कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !
Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!